
१) कापसाच्या दरावर दबाव (Cotton Rate)
कापसाच्या दरात सतत नरमाई दिसत आहे. कापसाच्या दरात मागील आठवड्यापासून सतत भाव कमी होत आहेत. खरिपाच्या लागवडी अगदी तोंडावर असल्याने शेतकरी कापूस विकत असल्याचं व्यापारी सांगत आहेत.
सध्या कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार ४०० ते ७ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काही दिवस बाजारावर कापूस आवकेचा दबाव राहण्याचा अंदाज व्यापारी आणि उद्योगांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळं कापसाचे दर स्थिर राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
२) सोयाबीनचे दर स्थिर (Soybean Rate)
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयातेलाच्या दरात मोठी नरमाई दिसून आली. सोयाबीनच्या वायद्यांनी हंगामात पहिल्यांदाच १४ डाॅलरच्या खालचा टप्पा गाठला. सोयाबीनचे वायदे घसरून १३.८९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले. तर सोयातेलाने ५० सेंटच्या पातळीवरून घसरून ४९ सेंट प्रतिपाऊंडची निचांकी पातळी गाठली.
सोयापेंडच्या दरात काहीशी सुधारणा दिसली. देशात मात्र सोयाबीनचे दर टिकून आहेत. सोयाबीनला सध्या सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. सोयाबीनची दरपातळी पुढील काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
३) केळीचा बाजार टिकून (Banana Rate)
देशातील बाजारात केळीची आवक मर्यादीत होत आहे. तर दुसरीकडे केळीला चांगला उठाव वाढत आहे. त्यामुळे केळीचे दर टिकून आहेत. सध्या केळीला प्रतिक्विंटल सरसरी १ हजार ३०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय.
पुढील काळात केळीची आवक मर्यादीत राहण्याचा अंदाज आहे. या काळात केळीचे दरही तेजीत राहतील, असा अंदाज केळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
४) ज्वारीचे भाव तेजीत (Jowar Rate)
राज्यात ज्वारीचे दर सध्या तेजीत आहेत. ज्वारीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. तर ज्वारीची बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून कमी झाली आहे.
सध्या राज्यातील पुणे, मुंबई, बार्शी, धुळे आदी ज्वारी पट्ट्यातील बाजारात आवक काहीशी अधिक दिसत असली तरी सरासरीपेक्षा कमीच आहे. त्यामुळे ज्वारीचे दर पुढील काही दिवस तेजीतच राहतील, असा अंदाज ज्वारी व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केला.
५) सरकारला स्वस्त तूर मिळू शकेल का? (Tur Rate)
देशातील बाजारातील चर्चा सध्या तुरीभोवती फिरत आहे. यंदाही भाव दबावात ठेवण्याच्या सरकारच्या मनसुब्यावर यंदा तुरीने पाणी फेरले. देशातील तूर उत्पादनात यंदा मोठी घट झाली होती. पण सरकार तुरीचा पुरवठा मागणी पूर्ण करु शकेल, असा विश्वास व्यक्त करत होते. सरकारच्या मते, देशातील तूर उत्पादन ३६ लाख टनांच्या दरम्यान राहील.
तर देशातील व्यापाऱ्यांकडे तुरीचा मोठा स्टाॅक आहे, असाही अंदाज सरकारने व्यक्त केला. पण प्रत्यक्ष तुरीच्या उत्पादनातील घट जास्त होती. शेतकरीही दरवाढीच्या अपेक्षेने टप्प्याटप्प्याने तूर विकत होते. त्यामुळं बाजारात तुरीचा पुरवठा सरकारच्या अपेक्षेप्रमाणे वाढला नाही. तुरीच्या दारतील तेजी टिकून राहीली. त्यामुळे सरकारने आपला मोर्चा व्यापारी, स्टाॅकिस्ट, प्रक्रियादार आणि आयातदारांकडे वळवला.
पण तरीही काही फायदा झाला नाही. आता शेवटी सरकारच तूर आयातीचा विचार करत असल्याचे अन्न सचिवांनी सांगितले. सराकरनेही तूर आयात केली तरी स्वस्त माल कुठे उपलब्ध आहे? भारताची मागणी पाहून तूर निर्यातदार देशांनीही तुरीचे भाव वाढवले.
म्यानमारमधून तूर आयात करायची म्हटलं तरी ८ हजार ५०० रुपयांच्या पुढेच दर पडत आहेत. त्यामुळे सरकारने आयातीचा निर्णय घेतला तरी सरकारला स्वस्त तूर मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.