
Tur Bajarbhav : तूर आणि उडदाच्या दरातील तेजीने सरकारच्या तोंडचं पाणी पळवलं. उत्पादन कमी झाल्याने तूर आणि उडदाच्या दरात मोठी तेजी आहे. आयात वाढवूनही दरात नरमाई येत नाही. निर्यातदार देशांमध्येही भाव वाढले.
यामुळे सरकारने देशातील व्यापारी, स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादारांवर दबाव वाढवला. पण यातूनही फारसं काही साध्या होताना दिसत नाही. त्यामुळं तुरीचे दर कमी करण्यासाठी सरकार कोणत्याही स्तराला जाऊ शकते, असा इशारा पुन्हा एकदा केंद्रीय खाद्य सचिवांनी दिला.
देशात यंदा तुरीच्या उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट झाली. उडदाचे उत्पादनही कमी झाले. त्यामुळे बाजारात टंचाई जाणवत आहे. पण दुसरीकडे मागणी कायम आहे. यामुळे दरात तेजी आहे. यंदा देशात ३६ लाख टन तुरीचे उत्पादन होईल, असा अंदाज सरकार व्यक्त करत आहे.
पण व्यापारी आणि उद्योगांच्या मते उत्पादन ३० लाख टनांपेक्षा जास्त नसेल. गेल्या हंगामातील शिल्लक साठाही कमी आहे. त्यामुळे तुरीच्या दरात तेजी आहे. तुरीचे दर कमी करण्यासाठी सरकारने व्यापारी, स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादारांवर दबाव वाढवला होता. पण यातून फारसं काही साध्या झालं नाही.
आता पुन्हा एकदा खाद्य सचिवांनी एक बैठक बोलवली होती. या बैठकीतही उद्योगांना इशारा देण्यात आला. तूर आणि उडदाचे भाव लवकर कमी झाले नाही तर सरकार स्वतः आयात करेल. भाव कमी करण्यासाठी सरकार कोणताही निर्णय घेऊ शकते, असा इशारा खाद्य सचिवांनी दिला.
या बैठकीत इंडियन पल्सेस ॲन्ड ग्रेन्स असोसिएशन, तमिळनाडू दाल मिलर्स असोसिएशन, असोसिएशन ऑफ पल्सेस इम्पोर्टर्स या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
इंडिया पल्सेस ॲन्ड ग्रेन्स असोसिएशनच्या मते, सध्या म्यानमारमध्ये ८० हजार टनांच्या दरम्यान तुरीचा स्टाॅक असू शकतो. तर आफ्रिकेतील देशांमध्ये ४० ते ५० हजार टन तूर असेल. सुदानमध्ये देशांतर्गत युध्दामुळे ६ ते ७ हजार टन तूर बंदरांवर अडकून आहे. त्यामुळे तूर आयातीवरही मर्यादा आहे. सरकारने कल्याणकारी योजनांमधून तुरीऐवजी इतर डाळींचे वितरण करावे, असा सल्लाही असोसिएशनने दिला आहे.
म्यानमारची निर्यातदार संस्था असलेल्या ओएटीएच्या आकडेवारीनुसार म्यानमारमधून १ लाख ५५ हजार टन तूर आणि १ लाख ७८ हजार टन उडदाची निर्यात झाली. मे महिन्यात निर्यात वाढू शकते. तर पुढील हंगामात म्यानमारमध्ये तुरीचे उत्पादन साडेतीन लाख टनांवर पोहचू शकते. भारताची मागणी लक्षात घेऊन म्यानमारमध्ये दर वाढले आहेत.
शेतकऱ्यांनी माल रोखल्याने निर्यातदारांकडे माल शिल्लक नाही. म्यानमारमध्ये अध्यापही ५ ते साडेपाच लाख टन उडदाचा स्टाॅक असू शकतो. पण हा स्टाॅक चांगल्या भावात बाजारात येऊ शकतो.
एकूणच काय तर सरकारने आयात करायची म्हटले तरी सरकारला विदेशात तूर कोणत्या भावात मिळते हे पाहावे लागते. कारण महत्वाच्या तूर उत्पादक सर्वच देशांमध्ये भाव तेजीत आहेत. त्यामुळे तुरीच्या दरातील तेजी टिकून राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी वक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.