Marketing Intelligence : आंतरराष्ट्रीय बाजारात आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात मोठी नरमाई आली होती. त्यानंतर आज म्हणजेच सोमवारी दुपारपर्यंत सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये काहिसे चढ उतार सुरु होते. सोयाबीनचे वायदे १३.३५ डाॅलर प्रतिटनांवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४३५ डाॅलरवरवर पोचले होते. देशातील बाजाराचा विचार करता सध्या भाव स्थिर दिसतात. बाजारातील आवकही स्थिरावली आहे. सध्या सोयाबीनची भावपातळी ४ हजार ८०० ते ५ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होती. देशातील बाजारात सोयाबीनची आवक आणखी काही दिवस कायम दिसू शकते. त्यामुळे दरात क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांचा चढ उतार दिसू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशातील बाजारात कापसाचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. कापसाला सरासरी ६ हजार ६०० ते ७ हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे. कापसाची आवक पाहिली तर खूपच कमी दिसते. यंदा देशातील कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. तरीही कापसाचे भाव शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा कमीच आहेत. त्यामुळे कापसाची विक्री शेतकरी कमी करताना दिसत आहेत. सध्याच्या भावात कापूस विक्री करण्यास अनेक शेतकरी इच्छूक दिसत नाहीत. शेतकऱ्यांना ८ हजारांचा भाव अपेक्षित आहे. त्यामुळे कापसाच्या भावात सुधारणा झाल्याशिवाय बाजारातील आवकही वाढण्याची शक्यता कमीच असल्याचे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.
देशातील लाल मिरची उत्पादन यंदा घटण्याची शक्यता आहे. यंदा महत्वाच्या लाल मिरची उत्पादक आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यातील मिरची पिकालाही फटका बसला. यामुळे या राज्यांमधील मिरची उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी राहण्याची शक्यता आहे. सध्या लाल मिरचीला १८ हजार ते ३२ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. महाराष्ट्रातील मिरची पट्ट्यातही सध्या भाव चांगले आहेत. यंदा दुष्काळामुळे यापुढील काळात मिरची उत्पादन घेणे शेतकरी टाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरचीच्या भावातील तेजी कायम राहू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
टोमॅटोच्या भावातील सुधारणा कायम आहे. बाजारातील टोमॅटो आवक कमी होताना दिसते. तर उठाम मात्र चांगला आहे. त्यामुळे सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. टोमॅटोच्या भावात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना काहिसा दिलासा मिळाला. पण अजूनही अपेक्षेपेक्षा भाव कमीच आहे. पाण्याच्या टंचाईमुळे टोमॅटोच्या नव्या लागवडी कमी आहेत. तसेत ज्या लागवडी आहेत त्यांना कमी पाण्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे बाजारातील आवक कमी कमी होत जाण्याची शक्यता आहे. परिणामी भावात काहिशी सुधारणाही दिसू शकते, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ज्वारीचा भाव चांगलाच वाढलेला दिसतो. ज्वारीला व्हरायटीप्रमाणे वेगवेगळा भाव मिळत आहे. ज्वारीचे घटलेले उत्पादन आणि वाढेलली मागणी यामुळे ज्वारीचा भाव टिकून आहे. सध्या बाजारात मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने ज्वारीला वाण आणि गुवणत्तेप्रमाणे ३ हजार ते ५ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. तर यंदा काही ठिकाणी विक्रमी ६ हजारांचाही भाव मिळाला. पण हा भाव काही मालालाच मिळाला. खरिपातील उत्पादन तर घटले तसेच रब्बी हंगामातील पिकाविषयीची चिंताही वाढली आहे. त्यामुळे यंदाही ज्वारीचा पुरवठा मागणीपेक्षा कमीच राहू शकतो. परिणामी ज्वारीच्या भावाला चांगला आधार मिळू शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.