
1. कापसाच्या वायद्यांमध्ये मागील काही दिवसांपासून चढ उतार सुरु आहेत. पण कापसाची दरपातळी एका मर्यादेत बदलत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदे वाढून ८७ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. तर देशातील वायदे ६१ हजार १०० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील पातळी स्थिर होती. यंदा जागतिक कापूस उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. देशातील पिकाचीही स्थिती चांगली नाही. त्यामुळे कापसाचे भाव यंदा चांगले राहण्याची शक्यता आहे, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.
2. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. पण देशातील भाव स्थिर दिसतात. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे काहीसे वाढून १३.५० डाॅलरवर पोचले होते. तर सोयापेंड ३९५ डाॅलरवर होते. देशातील बाजारात सोयाबीन आजही ४ हजार ४०० ते ५ हजारांच्या दरम्यान आहेत. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव ५ हजार १५० रुपयांवर स्थिर होते. देशातील सोयाबीन बाजाराची स्थिती पाहता भाव आणखी काही दिवस स्थिर दिसू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
3. कांद्याचे भाव बाजारात अद्यापही दबावातच दिसतात. कांद्याला आजही १ हजार ६०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कांद्याची बाजारातील आवक वाढलेली नाही. पण तरीही बाजारावर सरकारच्या निर्णयाचा दबाव असल्याचे व्यापारी सांगत आहेत. पण पुढील काळात काद्यांची आवक आणखी कमी होत जाईल. त्यामुळे कांदा बाजाराला आधार मिळू शकतो, असेही व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.
4. टोमॅटोचे भाव आता एक रुपया प्रतिकिलोपासून मिळत आहेत. बाजारातील वाढलेली आवक आणि मर्यादीत उठाव यामुळे भाव कमी झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. टोमॅटोला सध्या सरासरी ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर उत्पादन खर्च १२०० रुपये प्रतिक्विंटल येतो. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. टोमॅटो भावावरील दबाव पुढील काही दिवस दिसू शकतो, असे व्यापारी सांगत आहेत.
5. हरभरा भावातील तेजी कायम आहे. हरभरा भावात ऑगस्ट महिन्यापासून चांगली तेजी आली. देशातील बाजारात सणांसाठी जुलैपासूनच मागणी वाढू लागते. ऑगस्ट महिन्यातही मागणी चांगली राहिली. यंदा पावसाचे प्रमाण जसजसे कमी होत गेले तसे हरभार भावाला आधार मिळत गेला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यातही पाऊस कमीच राहिल्याने रब्बीविषयीची चिंता वाढली. यंदा रब्बी पिकांना पाण्याची टंचाई भासणार हे जवळपास स्पष्ट झाले. परिणामी हरभरा उत्पादकता कमी राहील, याची दाट शक्यता आहे. यामुळेच हरभऱ्याच्या भावात चांगली तेजी आली. सध्या बाजार समित्यांमध्ये हरभरा ५ हजार ५०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. तर मोठ्या ग्राहकपेठांमध्ये हरभरा भाव ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयांवर पोचला. वाढलेले भाव पाहून नाफेडनेही हरभरा विक्री सुरु केली. परिणामी दरावर मागील काही दिवसांपासून काहीसा दबाव दिसून येत आहे. नाफेड आता २०२२-२३ च्या हंगामातील माल विकत आहे. तसेच ऐन सणासुदीच्या काळात नाफेडची विक्री वाढू शकते, असा अंदाज आहे. पण यंदा हरभरा उत्पादनाविषयीची चिंता आहे. त्यातच हरभरा हे महत्वाचे कडधान्य असल्याने मोठी मागणी असते. त्यामुळे हरभरा भाव कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.