
तुरीचे दर टिकून राहणार
देशातील तूर टंचाई दूर करण्यासाठी सरकारने आयात तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकार आफ्रिका आणि म्यानमारमधून आयात होणाऱ्या जवळपास १ लाख टन तुरीची खरेदी करणार आहे. मात्र आफ्रिकेतील काही देशांमधून तूर निर्यात करण्यात अडथळे येत आहेत. मोझांबिकमधून भारताकडे येणारी जहाजे अडकून पडली आहेत. त्यामुळे वेळेवर तूर उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. सध्या देशात तुरीला ७ हजार ते ८ हजार ३०० रुपये दर मिळतोय. हा दर पुढील काही महिने टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
म्यानमारमध्ये उडदाचं नुकसान
भारताला उडदाचा पुरवठा करणारा मुख्य देश म्हणजेच म्यानमार. यंदा देशात उडदाचं उत्पादन कमी झालं. त्यामुळं उडदाची टंचाई निर्माण होऊन दर तेजीत आहेत. त्यामुळे म्यानमारमधील उत्पादनाकडे भारताचं लक्ष आहे. पण मागील तीन दिवसांपासून म्यानमारमधील उडीद उत्पादक भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे येथील उत्पादनही कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. सध्या देशात उडदाला ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. हे दर भविष्यातही टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
गाजराचे दर तेजीत
दिवाळीमुळं राज्यात सध्या गाजराला चांगली मागणी आहे. मात्र ऑक्टोबरच्या पहिल्या २० दिवसांमध्ये झालेल्या पावसानं अनेक भागांमध्ये गाजर पिकाला फटका बसला. परिणामी बाजारातील आवक सध्या कमी आहे. दुसरीकडं उठाव चांगला असल्याने दर तेजीत आहेत. सध्या राज्यातील बाजारात गाजराला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ४ हजार रुपये दर मिळतोय. गाजराचे दर पुढील काही दिवस तेजीत राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.
वाटाणा दर सुधारले
यंदा देशात कडधान्य टंचाई असल्याने दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तूर, उडीद आणि मुगाचे दर तेजीत आहेत. याचा फायदा वाटाण्यालाही होतोय. सध्या बाजारातील वाटाणा आवक कमी आहे. मात्र उठाव जास्त मिळतोय. त्यामुळे वाटाण्याचे दर तेजीत आहेत. सध्या राज्यातील बाजारांमध्ये वाटाण्याला प्रतिक्विंटल ७ हजार ते १२ हजार रुपये सरासरी दर मिळतोय. वाटाण्याचे दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज प्रक्रिया उद्योगातून व्यक्त होतोय.
बाजारात हरभरा दर अद्यापही दबावातच
देशातील हरभरा बाजार सुरुवातीपासूनच दबावात राहीला. प्रक्रियादारांना दिवाळीत दरवाढीची अपेक्षा होती. मात्र सरकारच्या धोरणांमुळे दर वाढले नाहीत. दिवाळीची खरेदी आता जवळपास संपली आहे. यंदा दिवाळीच्या काळात हरभरा डाळ आणि बेसनला मागणी वाढली होती. त्यामुळे उद्योगाकडून खरेदीही वाढली. मात्र प्रक्रिया उद्योगानं गरजेप्रमाणं खरेदी केली. त्यामुळं हरभरा दराला फारसा उठाव मिळाला नाही. नाफेडच्या विक्रीमुळे बाजारावर दबाव आहे. दुसरीकडे दरवाढीच्या अपेक्षेने साठा ठेवणाऱ्या स्टाॅकिस्टकडून माल बाजारात आणला जात आहे.
याचा परिणाम पुरवठ्यावर होतोय. परिणामी जास्त पुरवठा होऊन दर दबावात आलेत. सध्या हरभरा ४ हजार २०० ते ४ हजार ८०० रुपये दर मिळतोय. मागील काही महिन्यांपासून हरभऱ्याचा हा दर टिकून आहे. हरभरा दरात सुधारणा झाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांसह प्रक्रियादराही अडचणीत आले आहेत. त्यातच यंदा ऑक्टोबर महिन्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे रब्बीच्या पेरणीसाठी चांगला वातावरण आहे. पण ऐन पेरणीच्या काळातही हरभरा दर दबावात असल्याने शेतकऱ्यांची कमी पसंती मिळण्याची शक्यता आहे. शेतकरी चांगला दर मिळणाऱ्या पिकांकडे आकर्षित होऊ शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.