
१) सोयाबीनमध्ये किंचित वाढ (Soybean Rate)
देशातील काही बाजारांमध्ये सोयाबीन दरात आज क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांचा सुधारणा दिसली होती. तर अनेक ठिकाणी सोयाबीन दर स्थिर होते. आज बाजारात सोयाबीनची सरासरी १ लाख ३० हजार क्विंटलची आवक झाली होती. तर सोयाबीनला सरासरी ४ हजार ७०० ते ५ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला.
एनसीडीईक्सच्या डिलेव्हरी केंद्रांवर ५ हजार १५० ते ५ हजार ३५० रुपये भाव मिळाला. बाजारावर सध्या आवकेचा दबाव असल्याने दरही स्थिर राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
२) कापूस भाव आज स्थिर (Cotton Rate)
देशातील काही बाजारांमध्ये मागील दोन दिवसांमध्ये कापसाच्या भावात क्विंटलमागं १०० रुपयांची सुधारणा दिसली. पण फरदडच्या कापसाचे भाव आजही ६ हजार रुपयांपासून सुरु होते. तर आज बाजारांमध्ये १ लाख १० हजार गाठींच्या दरम्यान कापूस आला होता.
असे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. जूनमध्येही बाजारातील कापसाची आवक कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
३) हळदीचा बाजार कायम (Turmeric Rate)
बाजारात सध्या हळदीच्या दरात काहीसे चढ उतार दिसत आहेत. हळदीला आज प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. तर वायद्यांमध्ये हळदीचे भाव ७ हजार रुपयांवर आहेत. बाजारात सध्या आवक जास्त आहे. त्यामुळे दरावर दबाव दिसतो.
सध्या हळदीला निर्यातीसाठी मागणी चालू झाली. त्यामुळे पुढील काळात आवेकचा दबाव कमी झाल्यानंतर हळद दरात काहीशी सुधारणा दिसू शकते, असा अंदाज बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.
४) गव्हाच्या दरात सुधारणा (Wheat Rate)
देशातील बाजारात मागील दोन आठवड्यांपासून गव्हाच्या दरात जवळपास ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. गव्हाचे भाव सध्या २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. खुल्या बाजारात दरात सुधारणा झाल्याने शेतकरीही माल मागे ठेवत आहेत. त्यामुळे सरकारला केवळ २६२ लाख टनांची खरेदी करता आली.
यंदाही सरकारला खेरदीचे उद्दीष्ट गाठता येणार नाही. सरकारने यंदा १ हजार १२७ लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला तरी १ हजार ४० लाख टनांच्या दरम्यानच उत्पादन होईल, असा अंदाज व्यापारी आणि उद्योगांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पुढील काळात गव्हाच्या भावात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.
५) सरकारची हरभरा खरेदी २२ लाख टनांकडे (Chana Procurement)
सरकारने यंदा देशात १३६ लाख टन, म्हणजेच विक्रमी हरभरा उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. तर सरकारने आतापर्यंत २१ लाख ६५ हजार टनांची हमीभावाने खरेदी केली. यंदा हरभऱ्याला ५ हजार ३३५ रुपये हमीभाव आहे. पण असं अतानाही खुल्या बाजारात हरभरा दबावातच आहे.
वास्तविक पाहता सरकारची खरेदी वाढत असल्याने खुल्या बाजारात हरभरा भाव वाढणे अपेक्षित होते. पण झालं उलटं. खरेदी वाढत असूनही भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. हरभऱ्याला सध्या ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांचा भाव मिळत आहे.
सरकार हरभऱ्याची खरेदी इतर डाळींचे भाव कमी करण्यासाठी वाढवत असल्याचे व्यापारी आणि जाणकार सांगत आहेत. यंदा तूर आणि उडदाचे भाव तेजीत आहेत. मुगही हमीभावाचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. यामुळे निवडणुकांच्या तोंडावर डाळींचे भाव कमी करण्यासाठी सरकार हरभरा स्वस्तात बाजारात आणेल.
मागील हंगामात सरकारने हेच केले होते. पण यंदा परिस्थिती वेगळी आहे. गेल्या हंगामात देशात तूर, मूग, उडीद आणि मसूरचे उत्पादन चांगले होते. पण यंदा तूर आणि उडदाच्या उत्पादनात मोठी घट झाली.
तर हरभरा उत्पादनही सरकारच्या अंदाजापेक्षा कमीच असल्याचे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे सरकारने पुढील काळात हरभरा कमी भावात बाजारात आणला तरी इतर डाळींचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.