
१) सोयाबीन दरात काहीशी सुधारणा (Soybean Rate)
आंतरराष्ट्रीय आणि देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात (Soybean Market Rate) वाढ झाली. आजही देशातील अनेक बाजारात सोयाबीनचे दर क्विंटलमागं ५० ते १०० रुपयाने वाढले होते. सोयाबीनची सरासरी दरपातळी आता ५ हजार ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वायद्यांनी १५.०५ डाॅलरचा टप्पा गाठला. तर सोयापेंडही ४६५ डाॅलर प्रतिटनावर पोचले. यामुळे देशात सोयाबीनचे दर पुढील काळात आणखी सुधारू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
२) कापूस भाव किंचित वाढले (Cotton Rate)
देशातील बहुतांशी बाजारांमध्ये मागील तीन दिवसांमध्ये कापसाचे भाव क्विंटलमागे २०० रुपयाने वाढले होते. कापसाची सरासरी दरपातळी आता ७ हजार ८०० ते ८ हजार ५०० रुपयांवर पोचली.
आंतरराष्ट्रीय बाजारत कापसाचे वायदे ८३ सेंटवर स्थिर होते. देशात कापसाला मागणी चांगली आहे. सध्याच्या दरात उद्योगांना फायदाही होत आहे. त्यामुळे उद्योगांकडून खरेदी वाढली. पण पुढील काळात आवक कमी होऊन दर वाढतील, असा अंदाज आहे.
3) हिरवी मिरची तेजीतच (Green Chilli Rate)
राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून हिरव्या मिरचीची आवक कमी होत आहे. नुकत्याच झालेल्या पावसाचा मिरची पिकावर परिणाम झाला. त्यामुळे आवक कमी आहे. मात्र हिरव्या मिरचीला उठाव चांगला आहे.
परिणामी हिरव्या मिरचीला सध्या सरासरी २ हजार ५०० ते ४ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. मिरचीचे हे दर पुढील काळतही टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
४) डाळिंबाला चांगला उठाव
बाजारात सध्या डाळिंबाची उपलब्धता कमी आहे. चालू हंगामात डाळिंबाचे बदलते वातावरण आणि पावसामुळे मोठे नुकसान झाले. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला. यंदा काही भागांमध्ये गुणवत्ता चांगली असली तरी उपलब्धता कमी आहे.
त्यामुळे डाळिंबाला सध्या सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार ते ९ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. पुढील काही दिवस डाळिंबातील ही तेजी टिकून राहील, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.
५) तुरीचे भाव कमी करण्यासाठी सरकार आणखी काय करु शकते?
तुरीचे दर तेजीत असल्याने सरकार ॲक्शन मोडमध्ये आहे. सरकारने तुरीचा नेमका किती स्टाॅक आहे याच्या माहितीसाठी आणि हा स्टाॅक बाजारात आणण्यासाठी व्यापारी, आयातदार, स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादार यांच्यावर दबाव वाढवला आहे. त्यामुळे तुरीचा व्यापार मर्यादीत होत आहे.
पण बाजारातील आवकही कमी असल्याने तुरीचे दर टिकून आहेत. आजही अनेक बाजारात तुरीचा कमाल भाव ९ हजारांच्या पुढे आहे. तर कमाल भाव ८ हजारांवर आहे. सरकारच्या दबावानंतरही बाजारात दर कमी होत नाहीत. कारण तुरीचा स्टाॅक शेतकऱ्यांकडे जास्त आहे.
त्यातच लग्नसराई आणि समारंभामुळे तुरीच्या डाळीला उठाव आहे. उद्योगांनाही गरजेपुरताच माल मिळत आहे. स्टाॅक करायला माल नसल्याचे उद्योगांकडून सांगण्यात आले.
सरकारला दिलेल्या माहितीनुसार देशातील व्यापारी, प्रक्रियादार, आयातदार आणि स्टाॅकिस्ट यांच्याकडे १२ लाख ६४ हजार टन स्टाॅक आहे. हा स्टाॅक देशाला तीन महिनेच पुरु शकतो. तर उत्पादनच कमी असल्याने आयात वाढवून पुरवठा वाढवता येणार नाही.
सरकार पुढील काळात स्टाॅक लिमिटही लावू शकते, अशी चर्चा बाजारात आहे. पण तुरीचा स्टाॅक शेतकऱ्यांकडे आहे. त्यामुळे बाजारावर याचा काही काळ परिणाम जाणवेल. पण दीर्घकाळात तुरीचे दर ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.