
Tur Production : देशात तुरीच्या भावातील तेजी कायम आहे. बाजारातील तुरीची आवक कमीच आहे. तर तुरीला बाजारात चांगलाच उठाव मिळत आहे. याचा तुरीला आधार मिळतोय. मग सध्या तुरीला काय भाव मिळतोय? सरकारच्या तूर लागवडीच्या अंदाजावर उद्योगांना संशय का आहे? पाहूयात आजच्या मार्केट बुलेटीनच्या शेवटी.
1. कापूस बाजारात सुधारणा
कापसाच्या वायद्यांमध्ये आज संमिश्र स्थिती होती. देशातील कापूस वायदे आज दुपारपर्यंत काहीसे वाढून ६१ हजारांवर पोचले होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दीड नरमले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायदे ८६.६३ सेंट प्रतिपाऊंडवर होते. बाजार समित्यांमधील भाव मात्र आजही कायम होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थिती दरवाढीला पुरक आहे. त्यामुळे पुढील काळात कापसाच्या दरात सुधारणा अपेक्षित आहे, असे जाणकारांनी सांगितले.
2. सोयाबीनमध्ये नरमाई
देशात सोयाबीनचे भाव एकाच पातळीवर स्थिर आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांमध्ये दीड टक्क्यांची नरमाई येऊन १३.३८ डाॅलरवर वायदे आले होते. तर सोयापेंडच्या वायद्यांमध्ये जवळपास दोन टक्क्यांनी घड झाली होती. सोयापेंडचे वायदे ३९२ डाॅलर प्रतिटनांवर आले होते. सोयातेलाच्या भावात मात्र काहीशी वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनमध्ये चढ उतार सुरु असले तरी देशातील भाव आणखी काही दिवस स्थिर दिसू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
3. केळीचे भाव टिकून
श्रावणामुळे केळीला चांगला उठाव होता. त्यामुळे दरही टिकून होते. आता गणपतीमध्येही केळीला उठाव चांगला राहण्याची शक्यता आहे. परिणामी केळीचे भाव पुढील काळातही टिकून राहतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. सध्या केळीला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ५०० ते १ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. पुढील काही दिवसांमध्ये केळीचे भाव आणखी काहीसे सुधारु शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
4. गवारचे भाव तेजीत
बाजारातील गवारचे भाव टिकून आहेत. बाजारातील गवारची आवक कमीच आहे. पण गवारला चांगला उठाव आहे. यामुळे गवारचे भाव तेजीत आहेत. सध्या गवारला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. यापुढील काळातही बाजारातील गवारची आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे गवारच्या भावातील तेजीत टिकून राहू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
5. देशात तुरीच्या भावातील तेजी कायम आहे. बाजारातील तुरीची आवक कमीच आहे. तर तुरीला बाजारात चांगलाच उठाव मिळत आहे. याचा तुरीला आधार मिळतोय. आतापर्यंत देशातील तुरीची लागवड ४३ लाख हेक्टरवर पोचल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. आतापर्यंतची लागवड गेल्यावर्षीपेक्षा जवळपास ६ टक्क्यांनी कमी आहे. पण उद्योग आणि व्यापाऱ्यांच्या मते तुरीची लागवड सरकारच्या अंदाजापेक्षा जास्त प्रमाणात घटली आहे. त्यातच यंदा देशात दुष्काळी स्थिती आहे. याचा फटका तूर पिकाला बसत आहे. देशातील एकूण लागवडीपैकी तब्बल ६५ ते ७० टक्के क्षेत्र महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्येच आहे.
पण या दोन्ही राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. कर्नाटक सरकार दुष्काळ जाहीर करण्याच्या तयारीत आहे. तर महाराष्ट्रातही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. महाराष्ट्रात काही भागांमध्ये मागील दोन दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम सरी पडल्या. पण ऐन वाढीच्या काळात पाण्याचा ताण बसल्याने पिकाला मोठा फटका बसला. चालू हंगामातही तुरीचे उत्पादन कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तुरीच्या दरातील तेजी टिकून आहे. सध्या तुरीला बाजारात ११ हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तुरीच्या दरातील तेजी पुढील काळातही टिकून राहू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.