
आंतरराष्ट्रीय वायदेबाजार सुरु झाल्यानंतर सकाळपासून आज सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या दरात सुधारणा दिसली. दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे दीड टक्क्याने वाढून १३.४३ डाॅलरवर पोचले होते. तर सोयापेंडमध्ये एक टक्क्याची वाढ होऊन ४०२ डाॅलरचा टप्पा गाठला. सोयातेलामध्येही दोन टक्क्यांची सुधारणा होऊन ६१.१६ सेंटवर पोचले होते. देशातील बाजार मात्र ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान स्थिर होता. देशातील सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस या पातळीदरम्यान दिसू शकतो, असे जाणकारांनी सांगितले.
देशातील वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत कापूस २४० रुपयांनी वाढला होता. कापसाचे वायदे ५९ हजार १६० रुपयांवर होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात वायद्यांमध्ये चढ उतार दिसले. वायदे ८४.५८ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. बाजार समित्यांमधील दराचा विचार करता आज काही ठिकाणी क्विंटलमागं ५० रुपयांची सुधारणा दिसली. पण बाजारातील आवक आजही सरासरीपेक्षा जास्तच आहे. यामुळे सरासरी दरपातळी ६ हजार ५०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान कायम होती. चालू महिन्यात कापसाच्या भावात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
राज्यातील बाजारात बटाट्याची आवक सरासरीच्या तुलनेत काहीशी कमी दिसते. तर बटाट्याला उठाव चांगला आहे. यामुळे दरही टिकून आहेत. राज्यातील महत्वाच्या बाजार समित्या वगळता इतर ठिकाणी आवक कमी होतेय. सध्या बटाट्याला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ५०० ते २ हजार रुपयांचा भाव दिसतो. हा भाव पुढील काळातही कायम राहू शकतो, अशा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
हिरव्या मिरचीचे भाव बाजारात टिकून आहेत. राज्यात जुलैच्या तीन आठवड्यांमध्ये मिरची उत्पादक पट्ट्यात चांगला पाऊस झाला. याचा फटका मिरची पिकाला बसला होता. यामुळे बाजारातील आवक घटली. पण दुसरीकडे मागणी कायम होती. त्यामुळे मिरचीला सध्या प्रतिक्विंटल ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील मिरची आवक पुढील काही दिवसांमध्ये वाढण्याचा अंदाज आहे. यामुळे दरावरही परिणाम दिसू शकतो, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
देशात यंदा १ हजार १२७ लाख टनांचे गहू उत्पादन झाले. नव्या हंगा्मातील गहू एप्रिलपासून बाजारात आला. यापैकी सरकारने २६२ लाख टनांची खरेदी केली. तर ३०० ते ३५० लाख टन गव्हाचा देशात वापर झाला. यात बियाणे आणि खाण्यासाठी झालेल्या गव्हाच्या वापराचा समावेश आहे. तर व्यापारी, स्टाॅकीस्ट आणि मिलर्स यांनी ९० ते १०० लाख टनांचा स्टाॅक असल्याचे जाहीर केले. म्हणजेच सरकारकडे ६५० ते ७०० लाख टन गव्हाची नोंद झाली. तर ४०० ते ४५० लाख टन गव्हाचा सरकारला तपास लागत नाही. या गव्हाची साठेबाजी झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. सरकारच्या रडारबाहेर असलेला हा ४०० ते ४५० लाख टन गहू नेमका कुणाकडे आहे? याचीही माहीती नाही. त्यामुळे हा गहू बाजारात नेमका कधी येईल हेही सांगता येत नाही. तर १ मार्च ते ३१ जुलैपर्यंत २१० लाख टन गहू बाजारात आला.
व्यापारी, स्टाॅकिस्ट आणि मिलर्स यांनी स्टाॅक जाहीर केल्यानंतर दरातील वाढ चांगली आहे. एप्रिलमध्ये देशातील गव्हाचा सरासरी भाव ३ हजार १३२ रुपये प्रतिक्विंटल होता. तो २ ऑगस्टला ३ हजार २१३ रुपयांवर पोचला.दुसरीकडे एफसीआयच्या लिलावातही गव्हाचे भाव वाढले आहेत. बुधवारी पार पडलेल्या लिलिवात पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात गव्हाला प्रतिक्विंटल २ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. सरकारच्या लिलावातच भाव वाढल्याने किरकोळ बाजारातील भाव आणखी वाढण्याची शक्याता आहे. यामुळे सरकारची डोकेदुखी वाढणार आहे
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.