
देशातील महत्वाच्या कापूस (Cotton) उत्पादक राज्यांमध्ये नवीन हंगामातील कापसाला मुहुर्त लागला आहे. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, हरियाणा आणि तेलंगणात नवा कापूस बाजारात दाखल झालाय. अर्थात सध्या आवक नगण्य आहे. मुहुर्ताच्या कापसाला प्रति क्विंटल ११ हजारांपासून १६ हजार रुपये दर मिळतोय. मात्र हा दर केवळ एक क्विंटलचा काढला जातोय. इतर कापसाला ८ हजार ५०० रुपयांपासून १० हजार रुपये दर मिळतोय. कापूस पिकाचं पाऊस आणि कीड-रोगामुळं मोठं नुकसान होतंय, त्यामुळे यंदा उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता नाही. उत्पादन गेल्या वर्षीएवढंच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कापसाचे दर टिकून राहण्याची शक्यता आहे.
पेरुचे दर अद्यापही दबावातच
बाजारात सध्या पेरुचे दर दबावातच आहेत. मात्र बाजारातील आवकही कमीच आहे. राज्यातील केवळ १० ते १२ बाजार समित्यांमध्येच पेरुची आवक होत असल्याचं दिसतंय. मोठ्या बाजार समित्यांतील आवक ३०० ते ४०० क्विंटलच्या दरम्यान आहे. तर इतर बाजार समित्यांमधील आवक ही २० क्विंटलच्या आतच होतेय. असं असताना पेरुला अद्यापही मागणी वाढलेली नाही. त्यामुळं बाजारात पेरूला ३ हजार ५०० रुपये ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. मागणी वाढल्यानंतर पेरुच्या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
वांग्याचे दर टिकून राहणार
राज्यातील बाजारांमध्ये सध्या वांगी आवक कमीच आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसानं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. त्यातच अनेक भागांत पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे सध्या कमी उत्पादन हाती येतंय. राज्यातील पुणे, मुंबई आणि नागपूर अशा मोठ्या बाजार समित्यांमधील आवक ही सरासरी २०० क्विंटलच्या दरम्यान आहे. मात्र छोट्या बाजारांमधील आवक २० ते ३० क्विंटलपर्यंत होतेय. आवक कमी असल्यानं बाजारात दरही चांगला मिळतोय. सध्या वांग्याला २ हजार ते ३ हजार ५०० रुपये दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहण्याची शक्यता असल्याचं जाणकारांनी सांगितलं.
मुगाच्या दराला आधार मिळण्याची शक्यता
देशातील काही बाजारांमध्ये नव्या मुगाची आवक सुरु झाली. मात्र मालामध्ये ओलावा अधिक येतोय. त्यामुळं या मुगाला हमीभावापेक्षा कमी दर मिळतोय. यंदा केंद्र सरकारने मुगासाठी ७ हजार ७५५ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केलाय. मात्र सध्या बाजारात मुगाला केवळ ६ हजार ६०० ते ७ हजार रुपये दर मिळतोय. चालू खरिपात मुगाची लागवड ४ टक्क्यांनी घटली. त्यातच पिकाला पाऊस आणि कीड-रोगांचा फटका बसला. तर सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागानं दिलाय. नेमकं याच महिन्यात अनेक भागांत मुगाच्या काढणीला सुरुवात होईल. त्यामुळं उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. असं झाल्यास दराला आधार मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
मागील हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनसह सोयातेलाचे दर तेजीत आले होते. त्यामुळे सरकारनं सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या वायद्यांवर बंदी घातली होती. बाजारात सोयाबीनचे दर पडले होते. आजही सोयाबीन बाजार दबावात आहे. त्यातच ही बंदी कायम राहावी अशी मागणी आता केली जातेय. ही मागणी नेमकी कुणी केली? या संघटनेचा सोयाबीन वायद्यांना विरोध का आहे? वायदे बंद असल्यास शेतकऱ्यांचं काय नुकसान होतंय ?
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.