
खरिपात आतापर्यंत सोयाबीन लागवड गेल्यावर्षीपेक्षा ४ टक्क्यांनी जास्त झाली. १२२ लाख हेक्टरवर पेरा पोचला. तर यंदा सोयाबीनचा शिल्लक साठा जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्यातच खाद्यतेल बाजाराचा आणि आयातीचा दबाव दरावर आहे. यामुळे सोयाबीनचे भाव ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीनचे भाव आणखी काही दिवस तरी या पातळीवर दिसू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
2. तूर डाळ १५० रुपयांवर
देशातील बाजारात तुरीचे भाव आजही तेजीतच होते. तुरीचे भाव वाढल्याने तूर डाळीचे भावही आता १५० रुपयांच्या दरम्यान पोचले. तुरीला सध्या प्रतिक्विंटल ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. पुढील महिन्यापासून तूर आयात वाढेल. पण देशातील उत्पादनात यंदाही घट येण्याची शक्यता निर्माण झाली. यामुळे तुरीच्या दारतीली तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे.
सणांच्या पार्श्वभूमीवर डाळीला मागणी वाढल्याने हरभरा दरात काही बाजारांमध्ये वाढ झाली. जून महिन्यापर्यंत हरभरा भाव ५ हजारांच्या आतच होते. मात्र आता अनेक बाजारात दराने ५ हजारांचा टप्पा पार केला. सध्या हरभऱ्याला ४ हजार ७०० ते ५ हजार ३०० रुपयांपर्यंत भाव मिळतोय. पुढील काळात हरभरा दरात आणखी काहीशी सुधारणा दिसू शकते, असाही अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
बाजारातील आवक कमी असल्याने लसणाच्या दरात सुधारणा झाली. लसणाची बाजारातील आवक गेल्या काही दिवसांपासून कमी दिसते. पण उठाव मात्र कायम आहे. राज्यातील महत्वाच्या बाजारांमध्ये लसणाची उलाढालही कमी झाली. तर लसणाला सध्या ९ हजार ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. लसणाचे भाव आणखी काही दिवस कायम राहू शकतात. पण त्यानंतर बाजारात आवक वाढल्यानंतर दरावर दबाव येऊ शकतो, असे जाणकारांनी सांगितले.
देशातील बाजारात सध्या कापूस आवक जास्तच दिसते. कापसाची आजही सरासरी १८ हजार गाठी आवक झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. पण पुढील एक दोन आठवड्यांमध्ये आवक पुन्हा कमी दिसू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात चढ उतार दिसत आहे. पण सरासरी दरपातळी वाढलेली दिसते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला उठाव वाढला. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे शुक्रवारी ८४.२४ सेंटवर बंद झाले होते. तर देशातील वायदे ६८० रुपयांनी वाढले होते.
एमसीएक्सवर कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ५९ हजार ६०० रुपयांवर बंद झाले. वायद्यांमध्ये कापूस दरात चांगली वाढ झाली. पण बाजार समित्यांमधील भाव सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होते. आतापर्यंत देशातील कापूस लागवड गेल्यावर्षीपेक्षा जवळपास दीड टक्क्याने कमी दिसते. देशातील कापूस लागवड ११९ लाख हेक्टरवर पोचल्याचं सरकारच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं. पण पावसाने चिंता वाढली. ऑगस्ट महिन्यात देशातील कापूस उत्पादक पट्ट्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला. परिणामी कापूस उत्पादकतेला फटका बसू शकतो. पिकाचे नुकसान लगेच दिसल्यास दरातील वाढ जास्त असेल, असे अभ्यासकांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.