
Amaravati News : हस्त बहाराला मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका बसला. परिणामी यंदा लिंबूची अपेक्षित आवक होण्यासाठी आंबिया हंगामाची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळेच सध्या मागणी असतानाही अपेक्षित आवक नसल्याच्या परिणामी लिंबूचे दर चांगलेच तेजीत आले आहेत. तापमानात वाढ झाल्याने लिंबूचे दर ६००० ते ८००० रुपये क्विंटलवर गेल्याची माहिती स्थानिक फळ व भाजीपाला बाजारातील व्यापारी सूत्रांनी दिली.
उन्हाचा पारा वाढत असल्याने आरोग्यवर्धक पेय म्हणून लिंबाला मागणी वाढती आहे. परंतु अमरावती बाजार समितीत गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून लिंबाची अवघी दहा क्विंटल इतकी अत्यल्प आवक होत आहे. फेब्रुवारी महिन्यात उन्हाचा पारा ३० ते ३२ अंश सेल्सिअसवर होता. त्यामुळे बाजारात लिंबाला तितकीशी मागणी नव्हती. आता मात्र पारा ३५ ते ३६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने लिंबाला चांगलीच मागणी वाढली आहे.
उन्हाळ्यात लिंबू शरबताचा ट्रेंड सर्वदूर राहतो. त्यामुळेच व्यावसायिक तसेच घरगुती स्तरावर देखील लिंबाला मागणी राहते. परिणामी आता लिंबाचे दर चांगलेच वधारत नागपूरच्या कळमना बाजारात ते ५००० ते ८००० रुपये क्विंटलवर पोहोचले आहेत. त्यापूर्वी हे दर ६००० ते ६२०० रुपये क्विंटल होते. मध्यंतरी ६००० ते ७००० रुपयांचा दरही लिंबाला मिळाला.
फेब्रुवारी महिन्यात आवक ७० क्विंटलवर पोहोचली असताना हेच दर ३५०० ते ४५०० रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर आवक पुन्हा कमी होत २० क्विंटलवर घसरली. त्यामुळे उत्पादकांना ७००० ते ८००० रुपये क्विंटलचाही दर मिळाला. आता लिंबाचे दर ५००० ते ८००० रुपयांवर स्थिरावल्याची माहिती व्यापारीस्तरावर देण्यात आली. आवक आणि मागणीत तफावत राहिल्यास हे दर आणखी वधारतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
अमरावती बाजारातही तेजी
नागपूरच्या कळमना बाजार समितीसोबतच अमरावती बाजार समितीत देखील लिंबू आवक अवघी दहा क्विंटलवर आली आहे. त्यामुळेच लिंबाच्या दरात तेजी अनुभवली जात असल्याचे सांगण्यात आले. सध्या लिंबाला ७००० ते ८००० रुपये क्विंटल असा उच्चांकी दर मिळत आहे. फेब्रुवारी महिन्यात याच बाजारात ३५०० ते ४५०० रुपयांचा दर होता. त्यावेळी आवक २० क्विंटलची होती.
देशात मोठी उलाढाल
संत्रा लागवड गुटूंब, बिजापूर या भागात सर्वाधीक आहे. पंजाब, राजस्थान, आसाम, केरळ, दक्षिण भारतातील निलगिरी आणि मलबार प्रदेश आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेश भागातही लिंबू लागवड क्षेत्र सर्वाधीक असल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्रात देखील लिंबाखालील क्षेत्रात वाढ होत असल्याचे सांगितले जाते. जालना, अमरावती, अकोला, छत्रपती संभाजी नगर, अहिल्यानगर या भागात लिंबाखालील क्षेत्र आहे. भारतातील लिंबूवर्गीय पिकाची उलाढाल दहा हजार कोटी रुपयांची असल्याची माहिती आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.