
कोल्हापूर : केंद्र सरकारने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्यात स्थानिक बाजारातील साखर विक्रीचा कोटा (Domestic Market Sugar Sale Quota) वाढवून दिला आहे. या निर्णयाबाबत ‘इस्मा’ने (ISMA) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत ‘इस्मा’चे अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी अन्न मंत्रालय सचिवाना पत्र लिहून उद्योगाची नाराजी कळवली आहे. ऑगस्ट महिन्याचा देशांतर्गत साखर विक्रीचा कोटा २२ लाख टनांचा होता. सप्टेंबरमध्ये तो २३.५० लाख टन करण्यात आला. केंद्राने या अगोदरच जुलैचा कोटा ३१ ऑगस्टपर्यंत विक्री करण्याची मुदत वाढवली होती.
एकीकडे दिलेल्या महिन्यातील साखर कोटा विक्री होत नाही म्हणून तो कोटा दुसऱ्या महिन्यापर्यंत वाढवून देण्याचा प्रयत्न करत असताना केंद्र सरकारने मात्र सप्टेंबर महिन्यात दीड लाख टनांचा अतिरिक्त कोटा दिला आहे. हे अनाकलनीय आहे. सरकार जादा साखर कोटा विक्रीसाठी देत असल्याने कारखान्यावर विक्रीसाठीचा दबाव येत असल्याचे श्री. झुनझुनवाला यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान केंद्रीय अधिकाऱ्यांनी मात्र सणासुदीच्या काळामध्ये साखर मागणी वाढेल या हेतूने हा कोटा वाढवून दिल्याचे म्हटले आहे. कारखान्यांना जास्तीत जास्त साखर विक्री करता यावी, यासाठी कोटा वाढवून दिला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात २४.५० लाख टनांचा साखर कोटा केंद्राने दिला होता. या तुलनेत हा कोटा कमीच असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.