
Tomato Imports From Nepal : देशात टोमॅटोचे भाव वाढल्यानंतर केंद्र सरकार नेपाळमधून आयात करत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत सांगितले. पण भाव वाढले म्हणून खडबडून जागे झालेले सरकार दोन महिन्यांआधी टोमॅटो फेकून देत होते, तेव्हा निर्यातीसाठी पुढे का आले नाही, असा सवाल शेतकरी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.
गुरुवारी म्हणजेच १० ऑगस्टला अर्थमंत्र्यांनी लोकसभेत बोलताना टोमॅटोचे भाव कमी करण्यासाठी सरकार कायकाय करतंय याचा पाढाच वाचला. हे ऐकताना सहाजिकच टोमॅटो उत्पादकांच्या तळपायाची आग मस्तकात जात असेल. कारण अर्थमंत्री ज्या टोमॅटो भावाची माहिती देत होत्या तोच टोमॅटो अगदी दोन महिन्यांपूर्वी मातीमोल भावाने विकला जात होता. अर्थमंत्र्यांनी बोलताना एप्रिल आणि मे महिन्यात शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाची माहिती द्यायला हवी होती. शेतकऱ्यांना किलोला एक रुपयापेक्षाही कमी भाव मिळाला होता. याच भावाचे फळ म्हणून बाजारात आवक कमी होऊन भाव वाढले. याकडे मात्र अर्थमंत्र्यांनी दुर्लक्ष केलं.
टोमॅटोच्या सध्याच्या भाववाढीला सरकारचं धोरणही जबाबदार आहे. त्याकडे मात्र सध्याच्या चर्चेत सपशेल दुर्लक्ष केलं. टोमॅटोचे भाव पडल्यनंतर निर्यात सरकारने निर्यातीसाठी पुढाकार घ्यायला पाहिजे होता. भारतीय टोमॅटोला पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आदी देशांची पसंती असते. शेतकरी टोमॅटो फेकून देत होते, त्यावेळी बांगलादेशात टोमॅटोचे भाव वाढलेले होते. पाकिस्तानातूनही मागणी होती. पण सरकारने निर्यातीसाठी पुढाकार घेतला नाही. मार्च ते मे या काळात भाव कमी असताना निर्यात झाली असती तर दर काहीसे स्थिरावले असते. शेतकऱ्यांना मोठा भटका बसला नसता, लागवडीही एवढ्या घटल्या नसत्या आणि टोमॅटोच्या भावात विक्रमी वाढही दिसली नसती असे व्यापारी सांगतात.
एप्रिल आणि मे महिन्यात बाजारात आलेल्या टोमॅटोला २० ते २२ किलोच्या क्रेटसाठी केवळ ५० रुपयांपासून भाव मिळाला. वाहतूक खर्चही निघत नव्हता. आधीच्या हंगामातही उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळाला होता. दोन्ही हंगामातील सरासरी भाव ५ ते १० रुपये प्रतिकिलो होता. एप्रिल आणि मे महिना तसेच आधीच्या हंगामांमध्ये खिशातून पैसे टाकण्याची वेळ आली. परिणामी लागवडी कमी झाल्याचं शेतकरी आणि व्यापारी सांगतात. त्यातच अवकाळी पाऊस, तापमानातील अचानक होणारे बदल याचा टोमॅटो पिकाला फटका बसला. परिणामी बाजारातली आवक कमी होऊन टोमॅटोच्या दराने भरारी घेतली.
देशातील टोमॅटो उत्पादनात यंदा घट झाल्याचे दिसते. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या २०२२-२३ च्या हंगामातील पहिल्या फलोत्पादन अंदाजात देशातील टोमॅटो उत्पादन यंदा ०.४ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज व्यक्त केला होता. केंद्राच्या अंदाजानुसार, देशातील टोमॅटो लागवड जवळपास ९ लाख हेक्टरवर झाली होती. तर उत्पादन २०६ लाख टनांवर स्थिरावले. त्यातच पावसाळी हंगाम खूपच कमी शेतकरी घेत असतात. कारण या हंगामात पिकाचा उत्पादन खर्च जास्त असतो. परिणामी जून महिन्यापासून बाजारातील आवक कमी होत गेली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.