
Pune News : शेतकऱ्यांचा सर्व माल हमीभावाने खरेदीची आम्ही गॅरंटी देतो, असा दावा आपले केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान संसदेत करत असले तरी प्रत्यक्षात मात्र हा दावा फोल ठरतो. कारण खुल्या बाजारात आपल्या महत्वाच्या ११ पिकांपैकी ८ पिकांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. आपल्या महत्वाच्या कापूस आणि सोयाबीनला तर कमी भाव मिळत आहेच. शिवाय ज्वारी, बाजरी, मका, मूग, भुईमूग, सूर्यफूल या पिकांना बाजारात सधा हमीभावही मिळत नाही.
आपल्या राज्याचे महत्वाचे पीक असलेल्या सोयाबीनला तर हमीभावापेक्षा तब्बल ८०० ते ९०० रुपये कमी भाव मिळत आहे. म्हणजेच सध्या हमीभावापेक्षा १५ ते २० टक्के कमी भावात शेतकऱ्यांना आपले सोयाबीन विकावे लागत आहे. खुल्या बाजारात सरासरी भाव आज ४ हजार ते ४ हजार १०० रुपये आहे. दुसरीकडे हमीभावाने खरेदी सुरु आहे पण केंद्र कमी, किटकट प्रक्रिया आणि खेरदीसाठी लागणारा वेळ यामुळे शेतकऱ्यांवर खुल्या बाजारात सोयाबीन विकण्याची वेळ आली.
कापसाचेही तसेच आहे. मध्यम लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव ७ हजार १२१ आहे. तर लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव ७ हजार ५२१ रुपये आहे. मात्र बाजारात कापसाचा भाव ६ हजार ९०० ते ७ हजार ३०० रुपये आहे. म्हणजेच कापसाचा बाजारातील भाव हमीभावापेक्षा किमान ३०० ते ६०० रुपयाने कमी आहे.
ज्वारीचा भावही हमीभावापेक्षा खूपच कमी आहे. ज्वारीसाठी यंदा सरकारने ३ हजार ३७१ रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र प्रत्यक्षात बाजारात ज्वारी २ हजार ४०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. म्हणजेच हमीभावापेक्षा ज्वारीला किमान ६०० ते १ हजार रुपये कमी भाव मिळत आहे. म्हणजेच हमीभावापेक्षा २० ते ३० टक्के कमी भावात ज्वारी विकावी लागत आहे.
मक्याचा हमीभाव यंदा २ हजार २२५ रुपये आहे. मात्र मक्याला देशभरात सध्या सरासरी २ हजार ते २ हजार १०० रुपये भाव मिळत आहे. हमीभावापेक्षा किमान ५ टक्के कमी भाव आजही मक्याला मिळत आहे. बाजरीचा हमीभाव यंदा २ हजार ६२५ रुपये आहे. मात्र देशभरात बाजरी सरासरी २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. महाराष्ट्रात बाजरीचे भाव हमीभाव किंवा त्यापेक्षा जास्त दिसतात. मात्र महत्वाच्या बाजरी उत्पादक राज्यांमध्ये बाजरीचे भाव कमी आहेत.
मुगाचा हमीभाव यंदा ८ हजार ६८२ रुपये जाहीर केला आहे. मात्र कुठेही बाजारात मुगाला ८ हजारांचाही भाव मिळत नाही. देशभरात सध्या मुगाला ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. म्हणजेच हमीभावापेक्षा किमान २५ टक्के ते ३० टक्के कमी भाव मिळत आहे. सरकारने मुगाचा हमीभाव मागील तीन वर्षात मोठ्या प्रमाणात वाढवला. पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना हमीभावाएवढा भाव मिळत नाही.
भुईमुगासाठी यंदा सरकारने ६ हजार ७८३ रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र प्रत्यक्षात ५ हजार २०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान बाजारात भाव मिळत आहे. सूर्यफुलाचा भावही खुपच कमी आहे. सूर्यफुलाचा हमीभाव यंदा ७ हजार २८० रुपये आहे. मात्र प्रत्यक्षात सूर्यफुलाला बाजारात ५ हजार ५०० ते ६ हजारांचा भाव मिळत आहे. म्हणजेच हमीभावापेक्षा किमान १२८० ते १७०० रुपये कमी भाव मिळत आहे. म्हणजेच हमीभावापेक्षा १७ टक्के ते २५ टक्के कमी भाव मिळत आहे.
म्हणजेच खरिपातील महत्वाच्या पिकांना बाजारात हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. तर तूर, तीळ आणि भाताला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत आहे. एकतर सरकार ज्या पध्दतीने हमीभाव जाहीर करते त्यातच शेतकऱ्यांची फसवणूक होते. सरकार अर्धवट खर्च गृहीत धरून उत्पादन खर्च काढते. त्यानुसार हमीभाव जाहीर केले जातात. सध्या जाहीर होणारा हमीभाव अनेक पिकांच्या उत्पादन खर्चाएवढाही नाही, असे शेतकरी सांगतात. पण हा हमीभावही बाजारात मिळत नाही, अशी परिस्थिती आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.