
Pune News : चालू हंगामात ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये देशातील बाजारात १२४ लाख गाठी कापसाची आवक झाली. देशातील अंदाजित उत्पादनापैकी जवळपास ४१ टक्के कापसाची विक्री ३१ डिसेंबर झाली. पहिल्या तिमाहीचा विचार करता यंदाची आवक गेल्यावर्षीपेक्षा जास्त होती, अशी माहीती काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने दिली.
कापसाचा हंगाम ऑक्टोबरपासून सुरु होतो. म्हणजेच कापसाचा हंगाम सुरु होऊन आता ३ महीने पूर्ण झाले. यंदाच्या पहिल्या तिमाहीत कापसाची आवक गेल्यावर्षीपेक्षा जास्त राहीली. विशेष म्हणजे कापसाचे भाव शेतकऱ्यांना अपेक्षित असे नाहीत. महीना निहाय कापूस आवकेचा विचार करता ऑक्टोबर महिन्यात १७ लाख ५२ हजार गाठी आवक झाली होती.
नोव्हेंबर महिन्यात ५१ लाख ७० हजार गाठी कापूस बाजारात विक्रीसाठी आला होता. म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यात ६९ लाख २२ हजार गाठी कापूस बाजारात आला, असे काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयाने स्पष्ट केले.
मागील हंगामात म्हणजेच २०२३ मध्ये ऑक्टोबर महिन्यात २४ लाख १४ हजार गाठी कापसाची विक्री झाली होती. म्हणजेच यंदापेक्षा जास्त कापूस ऑक्टोबरमध्ये बाजारात आला होता. मात्र नोव्हेंबरची आयात कमी होती. नोव्हेंबरमध्ये ३३ लाख २७ हजार गाठी कापूस बाजारात विक्रीसाठी आला होता.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात २०२३ मध्ये ५७ लाख ४१ हजार गाठी कापूस बाजारात आला होता म्हणजेच शेतकऱ्यांनी विकला होता, असेही सीएआयाने दिलेल्या माहितीतून पुढे आले. म्हणजेच यंदा पहिल्या दोन महिन्यांमध्ये गेल्यावर्षीपेक्षा जवळपास १२ लाख गाठींनी आवक जास्त झाली.
डिसेंबर महिन्याचा विचार करता गेल्यावर्षीची आवक जास्त आहे. गेल्या हंगामात डिसेंबर महिन्यातील आवक ५८ लाख ५८ हजार गाठींची झाली होती. डिसेंबर २०२४ मध्ये ५४ लाख ५८ हजार गाठी कापूस बाजारात आला, असे सीएआयने म्हटले आहे. पहिल्या ३ तीन महिन्यांचा विचार करता डिसेंबरमधील आवकच जास्त दिसत आहे.
यंदाची आवक जास्त
देशातील बाजारात ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये १२४ हजार गाठी कापसाची आवक झाली. तर मागील हंगामात याच तीन महिन्यांमधील आवक ११६ लाख गाठींवर झाली होती. म्हणजेच यंदा पहिल्या तिमाहीतील आवक जवळपास ७ लाख गाठींनी जास्त झाली.
राज्यनिहाय आवक
उत्तर भारतातील पंजाब, हरियाना आणि राजस्थानमध्ये पहिल्या तीन महिन्यांत १४ लाख गाठी कापूस शेतकऱ्यांनी विकला. गुजरातमधील शेतकऱ्यांनी जवळपास २२ लाख गाठी कापसाची विक्री केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीही जवळपास २३ लाख गाठी कापूस विकला. तर तेलंगणातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक ३२ लाख गाठी कापूस विकल्याचे सीएआयने म्हटले आहे.
४१ टक्के कापसाची आवक
देशात यंदा ३०२ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने दिला आहे. तर डिसेंबरअखेरपर्यंत बाजारात १२४ लाख गाठी कापसाची आवक झाली. म्हणजेच अंदाजित उत्पादनापैकी ४१ टक्के कापूस बाजारात येऊन गेला. आणखी ५९ टक्के कापूस बाजारात यायचा बाकी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.