
Pune News: महाराष्ट्र सरकारने हमीभावाने २ लाख ९७ हजार टन तूर खरेदीला परवानगी दिली. पण सरकारने कर्नाटकप्रमाणे तुरीसाठी बोनसही जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. कर्नाटकने हमीभावार ४५० रुपये बोनस दिला आहे. त्यामुळे कर्नाटकमधील शेतकऱ्यांना हमीभाव ७ हजार ५५० रुपये आणि बोनसचे ४५० रुपये, असा एकूण ८ हजार रुपये भाव मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांना ८ हजार रुपये भाव देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
तुरीच्या भावात मागील वर्षभर चांगली तेजी होती. तुरीचा भाव उच्चांकी १२ हजार ५०० रुपयांवर पोचला होता. मात्र त्यानंतर भाव कमी होत गेला. आतातर हमीभावही मिळत नाही. बाजारात सध्या तूर ६ हजारांपासून विकली जात आहे. तर सरासरी भाव ६ हजार ५०० ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान आला. मागील वर्षभरात आलेल्या तेजीचा फायदा शेतकऱ्यांना झालाच नाही. उलट नवा माल बाजारात येण्याच्या आधीच भाव कोसळले. तुरीला हमीभावापेक्षा एक हजारांपर्यंत कमी भाव मिळत आहे. सरकारही शेतकऱ्यांची बोळवण केवळ हमीभावावर करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.
कर्नाटक सरकारने मात्र शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार करून तुरीला बोनस जाहीर केला. कर्नाटक सरकारने जानेवारीतच हमीभावाने तूर खरेदी जाहीर केली. कर्नाटक देशात तूर उत्पादनात आघाडीवर आहे. कर्नाटकातील काही भागात तुरीची आगाप लागवड होते. त्यामुळे काही बाजारांमध्ये तुरीची आवकही लवकर सुरु होते. पण तुरीला ६ हाजरांपासून भाव मिळत असल्याने शेतकरी नाराज होते. शेतकऱ्यांची नाराजी लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच हमीभावाने खरेदी जाहीर केली. त्यानंतर तुरीला बोनसही जाहीर केला.
कर्नाटकने यंदा ३ लाख ६ हजार टन तूर खरेदीचे उद्दीष्ट ठेवले. तसेच या सर्व तुरीला सरकारने ४५० रुपये बोनसही जाहीर केला. म्हणजेच हमीभाव ७ हजार ५५० रुपये आणि त्यावर बोनस ४५० रुपये, असे एकूण ८ हजार रुपयांचा भाव तुरीला कर्नाटक देणार आहे. त्यामुळे कर्नाटकमधील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
कर्नाटकनंतर जास्त तुरीचे उत्पादन महाराष्ट्रात होते. मात्र महाराष्ट्र सर्वच बाबतीत कर्नाटकच्या मागे दिसतो. महाराष्ट्राने आता कुठे २ लाख ९७ हजार टन तूर खरेदीचे उद्दीष्ट जाहीर केले. मात्र महाराष्ट्र सरकारने आद्यापही बोनस जाहीर केलेला नाही. खरे तर महाराष्ट्राची मुख्य पीके असलेल्या कापूस आणि सोयाबीनला हमीभावही मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तुरीकडून चांगली अपेक्षा आहे. मात्र तुरीचे भाव पडल्यानेही अपेक्षाभंग होत आहे. सरकारने कर्नाटकप्रमाणे बोनस जाहीर केला तर शेतकऱ्यांना किमान ८ हजारांचा भाव तरी मिळेल. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने तातडीने बोनस जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.