Pomegranate : सोलापुरातील डाळिंब संशोधन केंद्रावर शेतकऱ्यांची नाराजी

डाळिंब उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी सोलापुरात स्थापन झालेल्या राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राला येत्या रविवारी (ता. २५) तब्बल १७ वर्षे पूर्ण होत आहेत.
Pomegranate
PomegranateAgrowon

सोलापूर ः डाळिंब उत्पादकांच्या समस्या (Issues Of Pomegranate Producer) सोडवण्यासाठी सोलापुरात स्थापन झालेल्या राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राला (Pomegranate Research Center) येत्या रविवारी (ता. २५) तब्बल १७ वर्षे पूर्ण होत आहेत. पण एवढ्या वर्षानंतरही दोन वाणांव्यतिरिक्त (Pomegranate Verity) आणि प्रक्रियेवरील काही मोजक्या संशोधनाशिवाय डाळिंबाचे क्षेत्र संपुष्टात आणू पाहणाऱ्या कीड-रोगावरील समस्यांचे मूळ मात्र अद्यापही सापडलेले नसल्याने शुक्रवारी (ता. २३) सांगोल्यात झालेल्या बैठकीत संशोधन केंद्राच्या कामावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Pomegranate
Pomegranate Rate : डाळिंबाच्या मृग बहरावर पावसाने फेरले पाणी

अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला डाळिंब संघाचे संचालक बाळासाहेब देशमुख (पंढरपूर), बाबूराव गायकवाड, शिवाजीराव गायकवाड, नारायण काटकर, कोडिबा सिद (सांगोला) यांच्यासह माळशिरस आणि नजीकच्या भागातील शेतकरी उपस्थित होते.

Pomegranate
Pomegranate Rate : राजस्थान, गुजरातमधील डाळिंब दिवाळीच्या दरम्यान बाजारात येणार

या वेळी बोलताना श्री. चांदणे म्हणाले, की आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहोत. पण ठोस काहीच मिळत नाही. आतापर्यंत केंद्राने सोलापूर लाल आणि सोलापूर अनारदाणा हे दोन वाण संशोधित केले आहेत. पण त्याची साइज कमी आहे. त्याचा मार्केटसाठी उपयोग होत नाही.

कीड-रोगावरील उपायांबाबत संशोधन केंद्राने पेटंट मिळवल्याचं सांगितलं जातं. पण मुळात आम्हाला त्याची प्रात्यक्षिके दाखवा, केवळ आश्‍वासने नको, व्यावसायिक पद्धतीने एखाद्या प्लॉटवर त्याची प्रात्यक्षिके घेऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचे रिझल्ट दाखवा, असेही ते म्हणाले.

शिवाजीराव गायकवाड यांनीही संशोधन केंद्राचे काम असेच चालले, तर डाळिंबाला पर्याय म्हणून आता आम्हाला आंबा, सीताफळ, ड्रॅगन फ्रूटसारख्या अन्य फळांचा विचार करावा लागेल, असा इशारा दिला. तर बाळासाहेब देशमुख यांनी तेल्या, मर, पिन होल बोरर सारख्या समस्येमुळे डाळिंबाचे क्षेत्र वरचेवर कमी होत चालले आहे.

नैसर्गिक समस्या असतीलही, पण संस्थेच्या पातळीवर दीर्घकालीन उपाय सांगणारे संशोधन वा शिफारशी द्यायला हव्यात. संशोधन केंद्राने आपल्या कामाची पद्धती बदलली पाहिजे, असे सांगितले. बाबूराव गायकवाड, सिद यांनीही संशोधन केंद्राच्या कामावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

५० हजार हेक्टरवरील बागा काढल्या

अलीकडच्या काही वर्षांत डाळिंबावरील पिनहोल बोरर, तेल्या, मर यासारख्या कीड-रोगांच्या समस्या वरचेवर वाढतच चालल्या आहेत. परिणामी, डाळिंबाचे क्षेत्र संपुष्टात येऊ लागले आहे.

राज्यातील एकूण १ लाख ७५ हजार हेक्टरवरील डाळिंब क्षेत्रापैकी अलीकडच्या काही महिन्यात सुमारे ५० हजार हेक्टरवरील बागा शेतकऱ्यांनी काढून टाकल्याचे चित्र आहे. विशेषतः डाळिंबाचे हब असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात त्यापैकी सर्वाधिक १७ हजार हेक्टरवरील बागा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.

शेतकरी मागणार उत्तरे

संशोधन केंद्राच्याही अडचणी असतील, पण त्यांनी त्या सोडवाव्यात, त्यासाठी शेतकऱ्यांची मदत घ्यावी, पण कितीवर्षे त्याच त्या समस्या ऐकत राहायचं, असा प्रश्‍नही या बैठकीत शेतकऱ्यांनी केला. येत्या रविवारी (ता. २५) डाळिंब संशोधन केंद्रात १७ वा वर्धापन दिन कार्यक्रम आहे. या वेळी शेतकऱ्यांनी आपल्या प्रश्‍नांची उत्तरे मागण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com