Edible Oil : खाद्यतेलाचे दर खरंच २० टक्क्यांनी कमी झाले?
पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर (International Market Edible Oil Rate) २० ते ३२ टक्क्यांपर्यंत कमी झाले. देशातही खाद्यतेलाचे दर (Edible Oil) कमी झाल्याचा दावा सरकार आणि तेल कंपन्या करत आहेत. महागाईत होरपळणाऱ्या ग्राहकांना यामुळे मोठा दिलासा मिळत असल्याचा दावा केला जात आहे. परंतु प्रत्यक्षात किरकोळ दरात एव्हढी कपात झालेली नाही. (Did edible oil prices really go down by 20 per cent?)
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे देशातील कंपन्यांनीही खाद्यतेलाच्या किमती कमी कराव्यात, अशा सूचना केंद्र सरकारने केल्या. मात्र यापुर्वीच सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएसन ऑफ इंडिया तसेच इंडियन व्हेजिटेबल ऑईल प्रोडूसर्स असोसिएशन आणि सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन या संस्थांनी आपल्या सदस्यांनी किमती कमी करण्याच्या सूचना केल्यात, अशी माहिती सूत्रांनी दिली. असं असलं तरी आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी झाले त्या प्रमाणात देशात झालेले नाहीत, असंही केंद्रीय अन्न मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे उत्पादकांनी आठवडाभरात खाद्यतेलाच्या कमाल विक्री दरात म्हणजेच एमआरपीत लिटरमागे १० रुपयांची कपात करावी, अशा सूचनाही अन्न मंत्रालयाने केल्या आहेत.
बाजारात खाद्येतलाचे दर मागील महिनाभरात घसरले. पामतेलाचे दर जवळपास ३२ टक्क्यांनी कमी झाले. एक महिन्याआधी १७३५ डाॅलर प्रतिटनावरून पामतेल ८ जुलैला ११oo डाॅलरपर्यंत घसरले. तर मागील आठवडाभरातच दरात १० टक्के घट झाली. तर कच्चे सोयाबीन तेलाचे दरही २० टक्क्यांनी कमी झाले. सोयातेल १८२५ डाॅलरवरून १३५० डाॅलरपर्यंत नरमले. तर सूर्यफुल तेलही १६५० डाॅलरपर्यंत खाली आले.
मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्येतलाचे दर वाढले तेव्हा देशातील कंपन्यांनी लगेच किमती वाढवल्या. मात्र आता दर घसरले असतानाही कंपन्यांनी त्या प्रमाणात दर कमी केले नाहीत. हे खुद्द केंद्रीय ग्राहक आणि सार्वजनिक वितरण विभागानेच स्पष्ट केले. ८ मे च्या तुलनेत ८ जुलैपर्यंत पामतेलाचे किरकोळ दर केवळ ७ टक्क्यांनी कमी झाले. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील घट तब्बल ३२ टक्के आहे. सोयाबीन तेलाचे दर ३ टक्क्यांनी, सूर्यफुल ३ टक्के आणि मोहरी तेलाचे दर किरकोळ दरही केवळ ३ टक्क्यांनी घटले. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात या तेलांचे दर २० टक्क्यांपर्यंत कमी झाले आहेत. याचाच अर्थ असा की, कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी झाले त्या तुलनेत देशात कमी केले नाहीत.
याचा अर्थ असा होतो की, देशातील कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारातील दरघटीचा फायदा घेतला मात्र तो ग्राहकांपर्यंत पोचवला नाही. कंपन्यांनी नफेखोरी अद्यापही सुरुच आहे. मात्र सरकार असो की तेल उत्पादक, खाद्यतेलाचे दर लिटरमागे १५ रुपयांपर्यंत कमी झाल्याचा दावा करत आहेत. अनेक माध्यमांमध्येही यासंबंधीचे वृत्त झळकले. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळीच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढले तेव्हा कंपन्यांनी लगेच दरवाढ केली. मात्र दर कमी झाले असताना ग्राहकांची लूट सुरुच ठेवली आहे. सरकार वारंवार विनंती, सूचा करत आहे, मात्र कंपन्या केवळ कागदी घोडे नाचवत सरकार आणि ग्राहकांची बोळवण करत आहेत, असा दावा जाणकारांनी केलाय.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.