
Pune News : केंद्र सरकार हमीभावाने विक्रमी तूर खरेदी केल्याचा दावा करत असले तरी बाजारभाव मात्र मंदावले आहेत. आयातीला दिलेले मोकळे रान आणि सरकारी खरेदीचा दबाव बाजारावर आहे. सध्या तुरीचे भाव हमीभावापेक्षा किमान १२ ते १५ टक्क्यांनी कमी आहेत. याचा फटका देशातील तूर उत्पादकांना बसत आहे.
तुरीचे भाव मागील हंगामात तेजीत होते. त्यामुळे केंद्र सरकारने आयात खुली केली. भारताच्या या धोरणाने आफ्रिका आणि म्यानमारमधून मुक्त आयात सुरु आहे. तसेच तिथे उत्पादनही चांगले आहे.
केंद्र सरकारने नुकताच ३१ मार्च २०२६ पर्यंत तुरीची आयात खुली करण्याचा निर्णय घेतला. तूर आयातीवर शुल्क नाही तसेच इतर कुठलेही बंधन नाही. त्यामुळे आयातीचा लोंढा वाढत आहे. गेल्या वर्षभरात तुरीची विक्रमी १२ लाख ६४ हजार टन आयात झाली, असे आयातदारांनी सांगितले.
सरकारी तूर खरेदी
केंद्र सरकारने हमीभावाने यंदा १२ लाख टन तूर खरेदीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी जवळपास ६ लाख टनांची खरेदी सरकारने केली. यापूर्वी फक्त २०१७-१८ मध्ये जास्त खरेदी झाली होती. मागील दोन वर्षे सरकारला तुरीची अपेक्षित खरेदी करता आली नव्हती.
कारण बाजारभाव जास्त होते. पण यंदा बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने सरकारी खरेदीचे प्रमाण वाढले. मात्र पुढील काळात भाव वाढल्यानंतर सरकार हाच माल बाजारात उतरविण्याची शक्यता असल्याने बाजारावर दबाव येत असल्याचे जाणकारांनी सांगितले.
आयात मालाचे भाव
देशात तुरीचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. मात्र आयात मालाचे भाव देशातील तुरीपेक्षा कमीच आहेत. केंद्र सरकारने गेल्या वर्षी तुरीसाठी प्रति क्विंटल ७ हजार ५५० रुपये हमीभाव जाहीर केला होता. यंदा त्यात ४५० रुपयांची वाढ केल्यामुळे हमीभाव ८ हजार रुपयांवर पोहोचला आहे.
तर सध्या बाजारात तुरीला ६ हजार ५०० ते ६ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मात्र म्यानमारमधून आयात होणाऱ्या तुरीचे भाव ६ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर आफ्रिकेतून आयात होणाऱ्या तुरीचे भाव ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. आयात माल स्वस्त असल्याने देशातील बाजारवरही दबाव आला आहे.
आयातशुल्क वाढविण्याची मागणी
आयात तुरीचे भाव कमी आहेत. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांनाही कमी भाव मिळत आहे. आयात मालाचे भाव जास्त राहिल्यास देशातील भावही सुधारतील. सरकारने तुरीची आयात हमीभावापेक्षा कमी दरात करू नये, अशी मागणी आयातदार आणि उद्योगांनीही केली आहे.
तुरीच्या आयातीवर शुल्क लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तुरीची आयात हमीभावापेक्षा कमी दरात झाली नाही तर देशातील शेतकऱ्यांना किमान हमीभाव तरी मिळेल. त्यामुळे शेतकरी कडधान्याचे उत्पादन वाढवतील आणि आयात करण्याची गरज पडणार नाही, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.