
Pune News: काॅटन काॅर्पोरेशन ऑफ इंडियाने यंदाच्या हंगामात १०० लाख गाठी कापूस हमीभावाने खरेदी केला होता. त्यापैकी आतापर्यंत ३५ लाख गाठी कापूस विकला आणि ६५ लाख गाठी कापूस शिल्लक आहे. कापसाचे लिलाव सुरळीत सुरु असल्याचे काॅटन काॅर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात सीसीआयचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ललितकुमार गुप्ता यांनी सांगितले.
यंदा खुल्या बाजारात कापसाचे भाव हमीभावापेक्षा कमी होते. त्यामुळे सीसीआयच्या कापूस खरेदीला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने यंदा देशात ३०१ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज दिला. त्यापैकी सीसीआयने यंदाच्या हंगामात १२ राज्यांमध्ये जवळपास १०० लाख गाठी कापूस खरेदी केला होता.
देशातील कापूस उत्पादनापैकी जवळपास ३३ टक्के कापूस एकट्या सीसीआयने खेरदी केला. राज्यनिहाय कापूस खरेदीचा विचार करता सर्वाधिक ४० लाख गाठी कापूस तेलंगणात खेरदी केला. तेलंगणात कापसाचे भाव तुलनेत कमी होते. त्यानंतर महाराष्ट्रात २९ लाख गाठींची खरेदी झाली. तर गुजरातमध्ये १४ लाख गाठी कापूस खरेदी केला.
देशात सध्या सीसीआयकडेच सर्वाधिक कापसाचा साठा आहे. त्यामुळे सीसीआयच्या कापूस विक्रीचा बाजारावर थेट परिणाम दिसून येत आहे. सीसीआयची कापूस विक्रीही सुरळीत सुरु आहे. सीसीआयने आतापर्यंत ३५ लाख गाठी कापूस विकल्याचे सीसीआयचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ललितकुमार गुप्ता यांनी अॅग्रोवनला सांगितले. आतापर्यंतच्या कापूस विक्रीत सर्वाधिक कापूस विक्री महाराष्ट्रात झाली.
राज्यनिहाय कापूस विक्री
महाराष्ट्रात सीसीआयने आतापर्यंत जवळपास १६ लाख गाठी कापूस विकला. एकूण खेरदीपैकी महाराष्ट्रात अजून १३ लाख गाठी कापूस असावा, अशी माहिती काही व्यापारी संस्थानी दिली. तर तलंगणात जवळपास ८ लाख गाठी कापूस विकला. गुजरातमध्येही ५ लाख गाठींची विक्री झाली. मध्य प्रदेशात २ लाख गाठी आणि कर्नाटकात दीड लाख गाठींची विक्री झाली. इतर राज्यांमध्येही जवळपास अडीच लाख गाठींची विक्री झाली.
कापूस विक्रीचे दर घटवले
देशातील कापसाचे भाव हमीभावापेक्षा कमी असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे सीसीआयने कापूस विक्रीचे दर कमी करावेत, अशी मागणी उद्योगांनी केली होती. कच्च्या तेलाच्या भावात वाढ झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात काहीसे चढ उतार सुरु आहेत. देशातही भावात काहीशी सुधारणा झाली. सीसीआयने कापूस विक्रीचे भाव खंडीमागे जवळपास ५०० रुपयाने कमी केल्याचे उद्योगांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या लिलावात खंडीचे भाव ५३ हजार ५०० ते ५४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. तर कस्तुरी गाठीचे भाव ५५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.