Nashik News : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लादल्याने शेतकरी व कांदा व्यापाऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. एकंदरीत निर्यात कामकाज प्रभावित होऊन निर्यातीत जवळपास ८० टक्के घट आली आहे. या स्थितीत फक्त शेतकरी व व्यापारीच नव्हे;तर कांदा निर्यात वाहतूकदार व इतर घटक अडचणीत आल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. सध्या कांदा निर्यातीसाठी वाहतूक होत नसल्याने शेकडो वाहतूकदारांचा व्यवसाय बंद पडल्याची स्थिती आहे. तर संबंधित काम करणारे घटक व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. जवळपास ७०० हून अधिक वाहने जागेवर उभी आहेत.
वाहन कर्जाचे हप्ते भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने १९ ऑगस्ट रोजी अचानक कांदा निर्यातशुल्क लादल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. सरकारने कांदा उत्पादक व व्यापाऱ्यांचा विचार केला नाही. आता कांदा निर्यातीसंबंधी वाहतूक करणारे व्यावसायिक अडचणीत आल्याने त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे.
कांदा निर्यात संधी ओळखून अनेक वाहतूकदार व्यावसायिकांनी कांदा निर्यातकामी वाहन कर्ज घेऊन वैशिष्ट्यपूर्ण अशा वातानुकूलित, जनित्र सुविधेसह वाहने घेतली. प्रतिवाहनाची किंमत जवळपास ४० लाखांवर आहे. मुंबई बंदरावरील व्यवसायात ७ हजार वाहने आहेत. त्यापैकी कांदा निर्यात कामकाजात ७०० हून अधिक सुसज्ज अशी वाहने काम करतात.
त्यांच्यासमोर आता बेरोजगारीचा प्रश्न उभा आहे. व्यवसाय ठप्प झाल्याने चालक, क्लीनर यांचा पगार खिशातून देण्याची वेळ आली आहे. या शिवाय महिन्याला लागणारा विमा, त्यासंबंधी विविध प्रकारचे कर असे दीड लाखापर्यंत प्रति महिना खर्च खिशातून करावा लागत आहे. त्यामुळे सरकार याबाबत गांभीर्याने कधी पाहणार, असा प्रश्न आहे.
...अशा आहेत अडचणी
- वाहतूकदार व्यवसायिकांना वाहन कर्जाचे बँकेचे चालूहप्ते भरणे अशक्य
- वाहन चालकांचे मासिक पगार देणे अशक्य
- काही वाहतूकदारांवर पदरमोड करून पैसे देण्याची वेळ
- वाहन जागेवर उभे असतानाही वाहन विमा, विविध प्रकारच्या परवाने शुल्क यासह दर महिन्याचा जवळपास दीड लाख रुपयांचा भुर्दंड
- निर्यातकामी हाताळणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूककामी जवळपास लाखांवर मजुरांची तर गोणी पुरवठादार, कस्टम एजंट असे हजारो व्यावसायिकांचे कामकाज ठप्प
वाणिज्य मंत्रालयाकडे मांडली व्यथा
नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत अनिश्चित काळासाठी लिलाव बंद ठेवले आहेत. या परिस्थितीमुळे वाहतूकदारांची आर्थिक कोंडी झाली आहे. यामुळे सर्व वाहतूकदारांच्या गाड्या महिन्यापासून धूळ खात उभ्या आहेत, अशी परिस्थिती रिफर कंटेनर ट्रान्स्पोर्ट वेल्फेअर असोसिसिएशनने केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाला लिहलेल्या पत्रात मांडली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.