
Cotton Rate : कमोडीटी बाजारात सध्या कापूस चर्चेत आहे. काॅटन असोसिएशन ऑफ इंडियानं कापूस उत्पादनाचा अंदाज गेल्यावर्षीपेक्षा कमी केला, तर कापूस वापर वाढेल, असं सांगितलं. यामुळं कापूस बाजाराला मजबूत आधार तयार झालाय.
पण आतापर्यंत बाजारात किती कापूस आणि शेतकऱ्यांकडं किती कापूस शिल्लक आहे, यावरून खलबतं सुरु आहेत. तसचं सध्या बाजारातील कापूस आवक सरासरीपेक्षा चार पट असल्यानंच भावावर दबाव असल्याचंही सांगितलं जातं.
यंदा उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा घटलं. देशातील कापूस वापरही वाढला. यामुळं शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा होती. पण बाजार दबावातच आहे. शेतकऱ्यांकडे अजूनही ४० टक्के कापूस असल्याचं उद्योगांकडून सांगण्यात येतंय.
तर कापसाचा स्टाॅक कमी असल्याचं शेतकरी आणि जाणकार सांगतायेत. दुसरी चर्चा म्हणजे बाजारातील कापूस आवकेची. उद्योगांच्या मते बाजारात सध्या १ लाख ३० हजार ते १ लाख ५० हजार गाठींच्या दरम्यान आवक होतेय. तर कापूस कमी असल्यानं विक्रीही कमी असल्याचं शेतकरी सांगत आहेत.
काॅटन असोसिएशन ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर ते मार्च या सहा महिन्यांमध्ये जवळपास १९१ लाख गाठी कापूस बाजारात आला. देशातील कापूस उत्पादनाचा अंदजा सीएआयनं कमी करून ३०३ लाख गाठींवर आणलाय.
म्हणजेच ११२ लाख गाठी कापूस बाजारात यायचा होता. म्हणजेच ६३ टक्के कापूस बाजारात आला आणि ३७ टक्के कापूस बाजारात यायचा होता. गेल्याहंगामात मार्चपर्यंत २६२ लाख गाठी बाजारात आल्या होत्या, असंही सीएआयनं म्हटलंय.
काही संस्थांच्या मते आतापर्यंत म्हणजेच १९ एप्रिलपर्यंत देशातील बाजारात २ लाख १५ हजार गाठी कापूस आला. तर आणखी ८८ लाख गाठी कापूस बाजारात यायचा. तर कालची आवक १ लाख ४३ हजार गाठींची होती. विविध संस्था आणि व्यापारी यांनी दिलेल्या माहितीवरून हे स्पष्ट होतंय की, सध्या बाजारातील कापूस आवक सरासरीपेक्षा खूपच जास्त आहे. बाजारातील आवक जास्त असल्यानं दरावर दबाव दिसतो.
शेतकरी मात्र कापसाचा स्टाॅक असल्याचं सांगतात. शेतकरी आणि जाणकारांच्या मते २५ टक्क्यांपर्यंत कापूस शेतकऱ्यांकडं शिल्लक आहे. त्यामुळं काही दिवसांमध्ये बाजारातील आवक मर्यादीत होईल. कारण शेतकऱ्यांकडी संपूर्ण कापूस लगेच बाजारात येणार नाही.
काही शेतकरी हंगामाच्या शेवटीही कापूस विकतील. या शेतकऱ्यांचं प्रमाण कमी असल तरी ५ टक्के कापूस पुढच्या हंगामापर्यंत राहू शकतो. तर १० टक्क्यांपर्यंत कापूस मे नंतर बाजारात येईल, असा अंदाजही शेतकरी आणि जाणकारांनी व्यक्त केला.
सध्याचा विचार केला तर देशातील सर्व फंडामेंटल्स कापूस दर सुधारण्यासाठी अनुकूल आहेत. गेल्यावर्षीपेक्षा कमी झालेलं उत्पादन, वाढलेला कापूस वापर आणि पूर्ण क्षमतेने सुरु असलेले उद्योग हे घटक बाजाराला आधार देणारे आहेत. त्यामुळं दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय. पण आवकेचा दबाव आहे.
मागील हंगामात या काळात सरासरी ३० हजार गाठींची बाजारात आवक होती. पण सध्याची आवक सरासरी १ लाख २० हजार गाठींची होतेय. म्हणजेच आवकेच प्रमाण चार पटीने जास्त दिसतं. या आवकेच्या दबावामुळं कापूस बाजार नरमलेला दिसतो, असं जाणकार सांगतात.
देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज पुढील काळात आणखी कमी केला जाऊ शकतो, असं काही अभ्यासक आणि शेतकरी सांगतात. त्यातच पुढील हंगामातील लागवड आणि उत्पादनाबाबत निश्चित असा अंदाज येत नाहीये.
एल निनोचेही सावट असेल. या सर्व परिस्थितीचा कापूस बाजाराला आधार आहे. त्यामुळं आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर कापूस दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाजही कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.