Buldana Market News : शासनाने सुरू केलेली नाफेडची हमीभाव हरभरा खरेदी बंद केली आहे. ती पुन्हा सुरू करण्याऐेवजी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ८०० रुपये भाव फरक द्यावा अशी मागणी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Chikli Agriculture Produce Market Committee) माजी सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी केली आहे.
बाजारात शेतमालाचे भाव हमीभावापेक्षा कमी झाले की केंद्र सरकार व राज्य सरकार नाफेडमार्फत शासकीय हमीभाव केंद्र सुरू करते. नोंदणीकृत शेतकऱ्यांचा शेतमाल घेण्याची व्यवस्था करून शेतकऱ्यांनाही लाभ मिळून देते.
तसेच सरकारच्या विविध योजनांसाठी प्रसंगी दुष्काळाच्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी विशिष्ट प्रमाणात शेतीमालाची साठवणूक करून ठेवते. या वर्षी रब्बी हंगामात अशीच नाफेडने शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्याची मोहीम सुरू केली.
हजारो शेतकऱ्यांनी अधिकृत अशा विविध नाफेड केंद्रावर नोंदणीही केली. २१ मार्चला खरेदीचा शुभारंभ झाला. मात्र आठ-दहा दिवस फक्त खरेदी करण्यात आली. पाऊस व सुट्ट्यांचा व्यत्यय खरेदीमध्ये आला. त्यानंतर अचानकपणे नऊ एप्रिलला खरेदी बंद करण्यात आली.
शेतकऱ्यांना अर्ध्या रस्त्यातून हरभऱ्याची वाहने परत न्यावी लागली. तर काही शेतकऱ्यांची शेतीमालाची वाहने खरेदी केंद्रावर अडकली. शेतकरी पुन्हा हरभरा खरेदी सुरू होईल, अशी आशा धरून आहे. कारण बाजारात हरभरा ४५०० रुपयापर्यंत खाली आला आहे.
तर हमीभाव ५३३५ रुपये आहे. साहजिकच ८०० रुपयांचा तोटा होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात नाफेडची सात खरेदी केंद्रे आहेत. त्या केंद्रावर १५ हजारावर शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून पाच हजार शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी केल्या गेला आहे.
दहा हजार शेतकरी शिल्लक असल्याचा अंदाज आहे. या शेतकऱ्यांना हमीभाव व बाजारभाव यातील तफावत द्यावी, अशी मागणी भुसारी यांनी केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.