
Onion Market Rate : पुणेः देशातील बाजारात सध्या कांद्याला उत्पादन खर्चाएवढे भाव मिळत आहेत. तर दुसरीकडे बाजारतील आवकही कमी होताना दिसत आहे. ऑगस्टनंतर देशातील कांदा आवक कमी होऊन टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भावातही वाढ दिसू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशातील बाजारात सध्या कांद्याची आवक सरासरीपेक्षा कमीच दिसते. आज महाराष्ट्रातील आवक जास्त होती. त्यातही पिंपळगाव बसवंत बाजारातील आवक सर्वाधिक म्हणजेच ३३ हजार क्विंटल होती. त्यानंतर मध्य प्रदेशातील बाजारात आवक झाली. मध्य प्रदेशातील इंदोर बाजारात आज सर्वाधिक ३६ हजार क्विंटलची आवक होती. देशातील बाजारात आज कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल १ हजार ३०० ते १ हजार ४०० रुपयांचा भाव मिळाला.
केरळ राज्यात आवक कमी असल्याने भावही सरासरी १ हजार ८०० रुपये होते. कांदा उत्पादन होत नसलेल्या इतर राज्यांमध्येही यादरम्यान भाव होता. पण महत्वाच्या कांदा उत्पादक राज्यातील भाव कमीच होते. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात मागील तीन दिवसांपासून कांदा उत्पादक पट्ट्यातील बहुतांशी भागात पाऊस पडत आहे. त्यामुळे काही ठिकाणी कांदा चाळीत पाणी शिरले. तर काही भागांमध्ये कांद्याला पाणी लागल्याचे शेतकरी सांगत आहे.
पावसाचा जोर वाढत असल्याने साठवणुकीची पक्की व्यवस्था नसलेले शेतकरी कांदा विकत आहेत. तरीही सध्याची आवक सरासरीपेक्षा कमीच दिसते. बाजारातील कांदा आवक कमी होत असून दरात सुधारणा होत आहे. मागील महिनाभरात कांदा दरात २०० रुपयांपर्यंत वाढ झाली. पुढील काळातही बाजारातील कांदा आवक कमी होत जाऊन दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
खरिपातील लागवडींवर यंदा कमी पाऊसमानाचा परिणाम जाणवत होता. पण मागील आठवडाभरात देशातील महत्वाच्या कांदा उत्पादक पट्ट्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे कांदा लागवडीने वेग घेतला. केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात १४ जुलैपर्यंत ३२ हजार हेक्टवर कांदा लागवड झाली. मागील हंगामात याच काळातील लागवड ३६ हजार हेक्टरवर होती. यंदा सरकारने खरिपात ३ लाख ४१ हजार हेक्टरवर कांदा लागवडीचे उद्दीष्ट ठेवले आहे. मागील हंगामात ३ लाख २९ हजार हेक्टरवर लागवड झाली होती.
कर्नाटकात चित्रदुर्ग भागात कांदा लागवड जास्त होते. यंदा सरकारने या भागात २६ हजार हेक्टरवर कांदा लागवडीचे उद्दीष्ट ठेवले होते. तर आतापर्यंत १३ हजार हेक्टरवर लागवड झाली. आता सर्वच भागात पाऊस झाल्याने लागवड वेगाने सुरु आहे. उत्तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कूरनूल भागात लागवडी सुरु झाल्या. त्यामुळे ऑगस्टच्या मध्यापर्यंत लागवड आणखी वाढेल. पण पाऊसमान कसे राहते यावर उत्पादन अवलंबून आहे.
देशात सध्या कांद्याचा स्टाॅक कमी असल्याचं दिसतं. कारण रब्बी पिकाला यंदा पाऊस आणि वाढलेल्या उष्णतेचा मोठा फटका बसला. परिणामी चाळीतील कांद्याचे नुकसानही होत आहे. बाजारातील आवक कमी होत असल्याने दरातही सुधारणा दिसून येत आहे. पुढील काळात बाजारातील कांदा आवक कमी होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर ते डिसेंबर या काळात कांद्याचा तुटवडा जाणवू शकतो. त्यामुळे या काळात कांद्याचे भावही वाढू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.