
पुणे : सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर (International Market Edible Oil Rate) कमी झाले आहेत. त्यातच भारत सरकारने आयातशुल्क कमी केले आहे. त्यामुळे चालू तेल विपणन वर्षातील पहिल्या तिमाहीत खाद्यतेल आयात (Edible Oil Import) विक्रमी पातळीवर पोचली.
विशेष म्हणजे जानेवारीत भारताने तिप्पट सूर्यफूल तेल (sunflower oil) आयात केली. तर सोयाबीन तेलाची (Soybean Oil) आयातही वाढली. यामुळे देशात खाद्यतेलाचा साठाही विक्रमी पातळीवर पोचल्याचे साॅल्वेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता यांनी सांगितले.
भारताला गरजेच्या जवळपास ६५ टक्के खाद्यतेल आयात करावे लागते. त्यामुळे सहाजिकच देशातील खाद्यतेलाचे दर हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील दरांवर अवलंबून असतात.
ग्राहकांना खूष करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या हिताविरोधात निर्णय घेते. परिणामी शेतकऱ्यांना कमी दर मिळून देशातील उत्पादन वाढीस खीळ बसते. सध्याही असंच काहीसं घडताना दिसत आहे.
मागील दोन वर्षांमध्ये कोरोना आणि युध्दामुळे जागतिक खाद्यतेल बाजारात दराचा भडका उडाला. याची झळ भारतालाही बसली.
खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी केंद्राने आयातशुल्क कमी केले. पण आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर कमी होऊनही सरकारने आयातशुल्कात वाढ केली नाही. परिणामी देशात खाद्यतेल आयातीचा सपाटा सुरु झाला. याचा दबाव देशातील तेलबिया बाजार आणि प्रक्रिया उद्योगांवरही आला.
साॅल्वेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एसईएने देशातील खाद्यतेल आयात वाढल्याचे स्पष्ट केले. चालू तेल विपणन वर्षात पहिल्या तिमाहीत अर्थात नोव्हेंबर ते जानेवारी या काळात भारताची खाद्यतेल आयात ३१.५६ टक्क्यांनी वाढली.
सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाची आयात लक्षणीय वाढल्याचे एसईएने म्हटले आहे. पहिल्या तिमाहीत भारताने ४७ लाख ४६ हजार टन खाद्यतेल आयात केली. मागील वर्षात याच काळातील आयात ३६ लाख टन होती, असे एसईएने स्पष्ट केले.
सोयाबीन तेल आयातही वाढली
१) तिमाहीत ८ लाख ४८ हजार टन आयात
२) अर्जेंटीनाकडून ४ लाख ९१ हजार टन आयात
३) ब्राझीलकडून ३ लाख ३० हजार टन आयात
४) युक्रेनमधून २ लाख ३५ हजार टन आयात
पामतेलाची आयात ७२ टक्क्यांनी वाढली
या तिमाहीत २४ लाख २६ हजार टन कच्च्या पामतेलाची आयात झाली. मागील वर्षी याच काळातील आयात १४ लाख १२ हजार टनांवर होती. म्हणजेच आयात जवळपास ७२ टक्क्यांनी वाढली. रिफाईंड पामतेलाची आयात २.१६ लाख टनांवरून ६.३२ लाख टनांवर पोचली.
रिफाईंड तेलाची आयात वाढल्याने देशातील रिफायनरी उद्योगांवर परिणाम होत आहे. रिफाईंड तेलाची आयात वाढल्याने रिफायनरी उद्योग पूर्ण क्षमतेने होत नाही, असेही मेहता यांनी स्पष्ट केले.
खाद्यतेलाचा साठा विक्रमी पातळीवर
भारतात यंदा खाद्यतेल आयातीचा वेग जास्त आहे. त्यामुळे देशातील खाद्यतेलाचा साठाही विक्रमी पातळीवर पोचला. देशात १ जानेवारीपर्यंत ३२ लाख २३ हजार टन खाद्यतेलाचा साठा होता. मागील हंगामात याच तारखेला साठा २७ लाख ७२ हजार टनांवर होता.
विविध बंदरांवरील ८ लाख ९२ हजार टन खाद्यतेल होतं. यापैकी ४ लाख ९७ हजार टन कच्चे पामतेल, १ लाख ९५ हजार टन रिफाईंड पामतेल, १ लाख टन रिफाईंड सोयाबीन तेल आणि १ लाख टन कच्च्या सूर्यफुल तेलाचा समावेश आहे, असे मेहता यांनी स्पष्ट केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.