
Tur Rate : पुणेः देशात सध्या तुरीचे भाव तेजीत आहेत. त्यातच खरिपात आतापर्यंत तूर लागवड १६ टक्क्यांनी पिछाडीवर दिसते. माॅन्सूनच्या उरलेल्या काळात कमी पाऊस राहू शकतो. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने मोझांबिकमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या माध्यमातून येथील निर्यातदारांना तूर आयातीबाबत आश्वस्त केले. भारत मार्च २०२४ पर्यंत कोणत्याही निर्बंधाशिवाय तूर आयात करेल, असे उच्चायुक्तालयाने मोझांबिकमधील निर्यातदारांना सांगितले.
देशात सध्या तुरीचे भाव तेजीत आहेत. तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशात चालू हंगामात तुरीच्या उत्पादनता मोठी घट झाली. यामुळे पुरवठा कमी राहून दर वाढले. तुरीचा पुरवठा वाढीसाठी सरकारने अनेक निर्णय घेतले. सरकारने मुक्त तूर आयातीला ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली. स्टाॅक लिमिट लावले. बाजारावर बारीक लक्ष ठेवले. पण देशात पुरवठाच कमी असल्याने बाजारावर फारसा काही परिणाम दिसला नाही. यामुळे भाव तेजीतच आहेत.
पुरवठा वाढल्याशिवाय तुरीचे भाव कमी होणार नाही, याची जाणीव सरकारलाही होती. त्यामुळे खरिप लागवडीच्या काळात शेतकऱ्यांना तूर पेरण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारने घेतला. सरकारने लागवडीच्या काळात शेतकऱ्यांना हमीभावाने सरकारला तूर विक्रीवरील मर्यादा काढली. आतापर्यंत शेतकऱ्यांना एकूण उत्पादनाच्या केवळ २५ टक्के आणि सरकारने विनंती केल्यास ४० टक्के माल सरकारला हमीभावाने विकता येत होता. पण सरकारने ही मर्यादा काढून शेतकरी आपला संपूर्ण माल सरकारला विकू शकतात, असे बदल केला. म्हणजेच शेतकरी आपली सर्व तूर सरकारला विकू शकतात.
पण यंदा पावसाने सरकारल्या मनसुब्यावर पाणी फरले. जून महिन्यात देशातील बहुतांशी भागांमध्ये पेरणीयोग्य पाऊसच झाला नाही. यामुळे पेरण्या रखडल्या. त्यातच एल निनोमुळे माॅन्सूनच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस कमी राहण्याचीही शक्यता होती. तूर हे सहा ते सात महिन्याचे पीक आहे. ही स्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी यंदा तूर लागवड कमी केली. ताज्या आकडेवारीनुसार देशात ३१ लाख ५१ हजार हेक्टरवर तूर लागवड झाली. सध्याची लागवड गेल्यावर्षी याच काळातील लागवडीपेक्षा १६ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. यामुळे सरकारच्या उद्देशाला सुरुंग लागला. त्यामुळे सरकारने तूर आयात वाढीसाठी आता पुन्हा कंबर कसली.
आफ्रिकेतील देशांमध्ये चालू महिन्यात तूर काढणी सुरु होईल. पुढील महिन्यापासून भारतात माल पोचेल. मोझांबिक हा महत्वाचा तूर उत्पादक देश आहे. येथील निर्यातदारांनी जास्तीत जास्त तूर निर्यात करावी, यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहेत. भारतीय उच्चायक्तालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत आणि मोझांबिकमध्ये तूर आयातीचा द्विपक्षीय करार झालेला आहे. या करारानुसार मोझांबिक भारताला दोन लाख टन तूर निर्यात करेल. पण भारत सरकारने आता मात्रात्मक बंदन काढून टाकली आहेत. त्यामुळे निर्यातदार भारताला कितीही तूर निर्यात करू शकतील.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.