
Tur Rate Update : देशातील बाजारात तुरीचे दर तेजीत आहेत. तुरीच्या दरातील तेजी कमी करण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न करत आहे. पण तरीही अपेक्षेप्रमाणे तूर बाजारात येत नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. बाजारातील तूर आवक सध्या गरजेपेक्षा कमीच आहे.
तसेच पुढील काळातही तुरीच्या दरातील तेजी टिकून राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
तुरीचे भाव तेजीत असल्याने सरकार बाजारावर दबाव वाढवत आहे. सरकारने देशातील व्यापारी, स्टाॅकीस्ट, प्रक्रियादार आणि आयातदारांवर सर्व बाजुंनी दबाव वाढवला आहे. तुरीच्या स्टाॅकची माहिती घेण्यासाठी सरकारने बाजारतील सर्व घटकांसोबत बैठकांचे सत्र सुरुच ठेवले.
सरकार बाजारातील बारिक सारिक घडामोडींवर लक्ष ठेऊन आहे. तसेच व्यापारी आणि प्रक्रियादारांना वेठीस धरण्याचेही काम सुरु असल्याची टीका होत आहे. सरकार तुरीचे भाव कमी करण्यासाठी वाटेल तो निर्णय घेऊ शकते, असा इशाराही सरकारच्यावतीने देण्यात आला.
देशात सरकार दबाव वाढवून स्टाॅकमधील तूर बाजारात विकण्यासाठी भाग पाडत आहे. त्यामुळे आयातदार आणि व्यापारी विदेशात तुरीचा स्टाॅक करत आहेत. भारतात तूर आणल्यास सरकारच्या दबावाला बळी पडावे लागेल. त्यामुळे बाजारात तूर विकायची त्याचवेळी भारतात आणायची, असा मनसुबा आयातदार बाळगून आहेत.
सध्या म्यानमार, मालावी, दुबई आणि काही देशांमध्ये भारतीय व्यापारी, आयातदार आणि कंपन्यांनी स्टाॅक ठेवल्याची माहिती सरकारकडे आहे.
देशाबाहेर असलेल्या स्टाॅकबाबत सरकार मर्यादेपलिकडे काही करु शकत नाही. त्यामुळे व्यापारी आणि आयातदरांनी देशात माल आणण्याऐवजी तिकडेच साठवून ठेवला.
भारतात अपेक्षित दरपातळी झाल्यानंतर हा माल देशात येऊन बाजारात विकला जाईल अशी शक्यता आहे, असे आयातदारांनी सांगितले. देशातील तूर बाजाराने १० हजार रुपयांचा टप्पा गाठल्यानंतर स्टाॅकमधील तूर बाजारात येऊ शकते. कारण यंदा चढ्या भावानेच खरेदी करून हा स्टाॅक करण्यात आला आहे. त्यामुळे कमी भावात हा स्टाॅक बाजारात येणार नाही, असेही जाणकारांनी सांगितले.
सरकार सतत बाजारावर दबाव ठेऊन आहे. तरीही तुरीच्या दराने हळूहळू पुढे चाल करत अनेक बाजारांमध्ये ९ हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे. सध्या देशातील बाजारात तुरीला सरासरी ८ हजार ते ९ हजार २०० रुपयांचा दर मिळत आहे.
तुरीच्या दरात कासवगतीने सुधारणा होत असली तरी आवकेची टंचाई कायम आहे. सरकार दबावामुळे तुरीचा मोठ्या प्रमाणात उठावही होत नाही. उद्योगांकडून गरजेप्रमाणे खरेदी सुरु आहे. पण उद्योगांना गरजेप्रमाणेही तूर मिळत नाही, असे उद्योगांकडून सांगण्यात आले.
देशात यंदा तुरीची टंचाई आहे. पण देशाचा वापर मात्र कायम आहे. तुरीच्या डाळीला उठाव मिळत आहे. त्यामुळे सरकारच्या दबावानंतरही तुरीच्या दरातील तेजी टिकून आहे. पुढील काळातही तुरीची टंचाई कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तुरीच्या दरातील तेजी टिकून राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.