
Pune News : हमीभावाने सोयाबीन खेरदीसाठी नोंदणीची मुदत ६ जानेवारीला संपली. राज्यातील ७ लाख ४४ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी केवळ २७ टक्के म्हणजेच २ लाख शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी झाली. आणखी ७३ टक्के शेतकरी खरेदीची वाट पाहत आहेत. नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यासाठी मुदत वाढविण्याची नितांत गरज आहे. तसेच राज्यात एकूण उद्दीष्टापैकी केवळ २९ टक्के म्हणजेच ४ लाख १० हजार टनांची खरेदी झाली. अजून ७१ टक्के उद्दीष्ट साध्य करायचे आहे.
राज्यात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुदत होती. पण नोंदणीतील अडचणी आणि खरेदीतील समस्या यामुळे हमीभावाने सोयाबीन खरेदीचा बोजवारा उडाला. शेतकऱ्यांचा रोष पाहून सरकारने नोंदणीसाठी मुदत ६ दिवसांनी वाढवून दिली होती. आता ६ जानेवारीला राज्यात नोंदणीची मुदत संपली. शेवटपर्यंत नोंदणीमधील अडचणी कायम होत्या. वारंवार शेतकरी आणि खेरदी केंद्रांनी या अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र सरकारने शेवटपर्यंत त्याकडे दुर्लक्ष केले.
६ जानेवारीपर्यंत राज्यातील ७ लाख ४४ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी नाफेडकडे नोंदणी केली आहे. नाफेडने आतापर्यंत १ लाख ४० हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केले. म्हणजेच नाफेडला आणखी नोंदणी झालेल्या ४ लाख २० हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खेरदी करायचे आहे. तर १ लाख ८४ हजार शेतकऱ्यांनी एनसीसीएफकडे नोंदणी केली असून जवळपास ६० हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाले. एनसीसीएफला अजून १ लाख २४ हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करायचे आहे.
उद्दीष्टाच्या केवळ २९ टक्के खरेदी
राज्यात सर्वाधिक १४ लाख १३ हजार टन सोयाबीन खरेदीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. पण प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ ४ लाख १० हजार टनांचीच खरेदी पूर्ण झाली. म्हणजेच एकूण उद्दीष्टाच्या केवळ २९ टक्के खरेदी झाली आहे. अजून खेरदीचे ७१ टक्के उद्दीष्ट साध्य होणे बाकी आहे. खरेदीत आधीपासूनच असलेल्या अडचणींमुळे खरेदी होऊ शकली नाही.
मुदतवाढीची गरज
खरेदीचा बोजवारा उडालेला असतानाही सरकारने अजूनही सोयाबीन खेरदीची मुदत वाढवली नाही. ६ जानेवारीपर्यंत नोंदणी झालेल्या ५ लाख ४४ हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खेरदी होणे बाकी आहे. तर उद्दीष्टापैकी १० लाख टनांची खरेदी व्हायची आहे. तर खरेदीची मुदत १२ जानेवारी कायम आहे. हे सर्व उद्दीष्ट साध्य करण्यासाठी मुदतवाढीची गरज आहे.
सरकार आणखी १० लाख टन खरेदी करेल, अशी सरकारची मानसिकता दिसत नाही. मात्र किमान जेवढ्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली त्या शेतकऱ्यांचे तरी सोयाबीन खरेदी करावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यासाठी सरकारने आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.