Pune News: राज्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी नोंदणीची मुदत २२ फेब्रुवारीला संपली होती. मात्र सरकारने नोंदणीसाठी आणखी ३० दिवसांची मुदत दिली. तर हमीभाव खरेदीला ऱाज्यात आतापर्यंत कमी प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत २९ हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली. तर १८१३ क्विंटल तुरीची खरेदी झाली. पण बाजारात भाव कमी होत असल्याने सरकारची तूर खरेदी वाढण्याची शक्यता आहे.
तुरीचे बाजारभाव हमीभावापेक्षा कमी झाल्याने सरकारने राज्यात तुरीची हमीभावाने खरेदी जाहीर केली. राज्यात २४ जानेवारीपासून हमीभावाने तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्यास सुरुवात झाली. मात्र आतापर्यंत नाव नोंदणीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद मिळाला. राज्यातील केवळ २९ हजार २५४ शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली. नाव नोंदणी करण्यातही अनेकदा अडचणी आल्या. तसेच शेतकरी रब्बी पिकांची काढणीच्या कामात व्यस्त असल्याने नाव नोंदणीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. नोंदणी कमी झाली.
तुरीचा बाजारभाव
देशातील बाजारात तुरीची आवक वाढत आहे. कर्नाटकातील बाजारात आवक वाढलेली आहे. तर महाराष्ट्रातील बाजारांमध्येही आवक वाढत आहे. सरकारची खरेदी सुरु झाल्याने खुल्या बाजारातील पडझडही थांबल्याचे दिसते. तुरीला सध्या खुल्या बाजारात सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे.
तर चांगल्या मालाचे म्हणजेच नाफेड खरेदी करते त्या गुणवत्तेच्या मालाचे भाव ७ हजार १०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर हमीभाव ७ हजार ५५० रुपये आहे. पण खुल्या बाजारात माल विकल्यानंतर लगेच पेमेंट मिळते. त्यामुळे नाफेडच्या गुणवत्तेच्या मालाचे भाव २०० ते ४०० रुपयाने कमी असूनही शेतकरी खुल्या बाजारात माल विकत असल्याचे दिसते.
तूर खरेदी अल्प
बाजारात तुरीचे बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने सरकाच्या तूर खरेदीला प्रतिसाद मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ १८१३ क्विंटल तुरीची खरेदी राज्यात झाली. फक्त १६१ शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी पूर्ण झाली. राज्यात १३ फेब्रुवारीपासून तूर खरेदीला सुरुवात झाली. पण मालातील ओलावा आणि सरकारी खरेदीतील अडचणी यामुळे तूर खरेदी अल्प झाली.
सोयाबीनचा अनुभव तूर खरेदीत अडसर
सध्या बाजारात तुरीला हमीभावापेक्षा ४०० ते ७०० रुपयांच्या दरम्यान कमी भाव मिळत आहे. तरीही सरकारच्या हमीभाव खरेदीला कमी प्रतिसाद मिळत आहे. सोयाबीन खरेदीतील अनुभव पाहता शेतकरी खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. नाव नोंदणी करून अनेक दिवस खरेदी होत नाही, गुणवत्तेच्या नावाखाली कपात केली जाते, पेमेंटमध्ये अडचणींचा अनुभव सोयाबीन विकताना आला. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना लगेच पैशांची गरज आहे त्यांनी खुल्या बाजारात तूर विक्रीला प्राधान्य दिल्याचे दिसते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.