
Akola News: यंदाच्या हंगामात ‘नाफेड’मार्फत खरेदी झालेल्या सोयाबीन खरेदीत जिल्ह्यात घोळ झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या खरेदी केंद्रावर नेमलेला व्यवस्थापक, संगणकचालक आणि अज्ञात व्यापाऱ्यांनी संगनमताने सुमारे १३०० क्विंटल सोयाबीन खरेदीच्या खोट्या नोंदी केल्याचा प्रकार आहे. या प्रकरणात शेतकरी उत्पादक कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी जिल्हा पणन अधिकारी, तसेच पोलिसात तक्रार देत दोषींविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.
शासकीय दराने खरेदी केल्या जाणाऱ्या केंद्रांवर व्यापाऱ्यांचा माल खरेदी केला जातो हे वारंवार बोलले जाते. या प्रकारच्या व्यवहाराचा प्रकार जिल्ह्यात समोर आला आहे. महाराष्ट्र राज्य पणन विभागाचे बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथे सोयाबीन खरेदी केंद्र होते. येथील अंदुरा फार्मर प्रोड्यूसर कंपनीअंतर्गत हे केंद्र चालण्यात आले होते.
या खरेदी प्रक्रियेसाठी शेतकरी कंपनीने व्यवस्थापक, संगणकचालकांची नियुक्ती केलेली आहे. त्यांच्या देखरेखी सुरुवातीला योग्य पद्धतीने खरेदी झाली. मात्र फेब्रुवारीत खरेदी बंद होण्याच्या तारखेदरम्यान अज्ञात व्यापाऱ्याने व्यवस्थापक, संगणकचालकाला हाताशी धरून १२९७ क्विंटल सोयाबीन विक्रीच्या खोट्या नोंदी करून घेतल्या. याची सुमारे ५० लाखांची रक्कम होते.
हा प्रकार समजताच शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वराडे यांनी आधी जिल्हा पणन अधिकारी व बाळापूर तालुक्यातील उरळ पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. केंद्र व्यवस्थापक उदय उबाळे (वय ४५) व संगणकचालक आकाश अमझरे (वय ३०, रा. अंदुरा) आणि अज्ञात व्यापारी, शेतकऱ्यांनी ही फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
व्यवस्थापक, संगणकचालकाने अज्ञात व्यापारी व शेतकऱ्यासोबत संगनमत करून या केंद्रावर १२९७ क्विंटल सोयाबीन विक्रीच्या खोट्या लॉट नोंदी तयार केल्या व शेतकरी कंपनीची फसवणूक करीत आर्थिक नुकसान केले. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाने नियुक्त केलेल्या या केंद्रावर सोयाबीन मोजून घेणे व ते सोयाबीन ‘नाफेड’च्या गोदामात पोहोचविणे आवश्यक होते.
त्यानंतर ‘नाफेड’द्वारा संबंधित शेतकऱ्याला त्याने विक्री केलेल्या सोयाबीनचे चुकारे मिळत होते. या पद्धतीने शेतकरी कंपनीच्या खरेदी केंद्रावर कामकाज सुरू होते. मात्र शेतकरी कंपनीने फेब्रुवारी महिन्यात साधारणतः १५ तारखेनंतर कंपनीस्थळी मोजण्यात आलेले सोयाबीन व ‘नाफेड’ला पोचविलेले सोयाबीन तसेच ‘नाफेड’कडून निघालेले पेमेंट या बाबत कागदपत्रांची तपासणी केली असता या ठिकाणी १२९७ क्विंटल सोयाबीन हे ‘नाफेड’च्या गोदामात पोहोचलेलेच नसल्याचे उघड झाले.
सुमारे ५० लाख रुपयांची फसवणूक
सोयाबीन घोळाबाबत व्यवस्थापक व संगणक चालकास विचारले असता त्यांनी व्यवस्थित माहिती दिली नाही. व्यवस्थापकाच्या सांगण्यावरून नोंदी केल्याचे संगणकचालकाने वराडे यांना सांगितले. या माहितीच्या आधारे शेतकरी कंपनीमार्फत श्री. वराडे यांनी जिल्हा पणन अधिकाऱ्याकडे २४ फेब्रुवारीला लेखी तक्रार देत माहिती कळवली आहे.
शासकीय केंद्रावर माल विक्रीसाठी आलेला नसतानाही संगनमताने संगणकामध्ये खोट्या नोंदी घेत खोट्या कागदपत्रांच्या आधारे शेतकरी कंपनी, शासनाची सुमारे ५० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून उरळ पोलिस तपास करीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.