संत्रा लागवडीसाठी एक वर्षे वयाची कलमे निवडावीत.मध्यम ते हलक्या जमिनीसाठी जबेरी व भारी जमिनीसाठी रंगपूर लिंबू या खुंटावरील कलमांची निवड करावी. लागवड शक्यतो रिमझिम पाऊस सुरु असताना करावी. संत्रा कलमांची लागवड पावसाळा सुरू होताना करणे चांगले असते. एक पाऊस पडून गेल्यानंतर आणि पुढे ढगाळ हवामानाचा काळ सुरू झाल्यानंतर संत्रा कलमांची लागवड करावी. पावसाळा संपताना किंवा संपून गेल्यानंतर लागवड करणे टाळावे. मध्य जुलैपर्यंतचा काळ लागवडीसाठी चांगला असतो. कलमांची निवड
कलमे निरोगी, जास्त उत्पादन व दर्जेदार फळे देणाऱ्या मातृवृक्षाचे डोळे वापरूनच तयार केलेली असावीत. संत्र्याच्या कलमा किकरपानी, वेलिया किंवा पानसोट असलेल्या मातृ वृक्षापासून तयार केलेली नसावीत. कलम निवडताना संत्र्याचा डोळा कोणत्या खुंटावर बांधलेला आहे हे पाहावे. कारण खुंटाचा झाडाची शारीरिक वाढ, फळधारणाशक्ती, फळांचे गुणधर्म आणि झाडांचे आयुष्य यावर परिणाम पडत असतो. कलमे रोगप्रतिकारक्षम खुंटावर तयार केलेली असावीत. मध्यम ते हलक्या जमिनीसाठी जबेरी व भारी जमिनीसाठी रंगपूर लिंबू या खुंटावरील कलमांची निवड करावी. योग्य खुंट व योग्य प्रकारचा डोळा यांच्या खात्रीसाठी कलमा कृषी विद्यापीठ किंवा शासकीय परवानाधारक रोपवाटिकेतूनच घ्याव्यात. जबेरी किंवा रंगपूर लिंबू या खुंटावर २५ ते ३० सेंमी उंचीवर बांधलेल्या कलमा निवडाव्यात. कमी उंचीवर बांधणी केलेल्या कलमा मातीच्या आणि पाण्याच्या संपर्कात येऊन बुरशीजन्य रोगास बळी पडतात. कलमांचे फाटे परिपक्व झालेले असणे आवश्यक आहे. फाट्यावर पांढऱ्या बारीक रेषा असतील तर फाटे परिपक्व झाले असे समजावे. ४५ ते ६० सेंमीपर्यंत सरळ वाढलेल्या कलमा चांगल्या असतात. अति उंच कलम लागवडीसाठी वापरू नयेत. त्या कलमा वेलीया प्रकारच्या असण्याची शक्यता असते. कलमांवर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव नसावा. कलम रोगमुक्त असावे. जुन्या झालेल्या खुंटावरील कलमे लागवडीस योग्य नसतात. साधारणतः एक वर्षे वयाची कलमे लागवडीसाठी निवडावी. कलमांना भरपूर मुळे असावीत. कलमांच्या खोडावर इतर फूट नसावी. डोळ्यांचा सांधा चांगला भरलेला, जखम व व्रणरहित असावा. लागवड करताना घ्यावयाची काळजी
जमिनीतून कलमा काढताना आदल्या दिवशी त्यास भरपूर पाणी द्यावे. ढगाळ वातावरण असताना कलमा रोपवाटिकेतून काढणे फायदेशीर असते. कलमे काढताना तंतुमय मुळांना कमीत कमी इजा होईल याची काळजी घ्यावी. शक्यतो कलमे 'डिगिंग फॉर्क' ने काढाव्यात. कलमा सबलीने काढल्यामुळे सोटमूळ आणि तंतुमय मुळे तुटण्याची शक्यता असते. कलमे काढल्यानंतर सोट मुळाचा शेवटचा भाग आणि इजा झालेली मुळे सिकेटरने काळजीपूर्वक छाटून टाकावीत. कलमांच्या शेंड्याकडील कोवळी पाने सुद्धा काढून टाकावीत. फक्त परिपक्व पाने ठेवावीत. मुळांची संख्या आणि पानांच्या संख्येचे योग्य प्रमाण असावे. कारण काढणीच्या वेळी काही मुळ्या तुटतात. सर्व पाने ठेवली गेल्यास त्यांचे पोषण व्यवस्थित होत नाही. रोपे दगावण्याचा संभव जास्त असतो. कलमा लागवडीपूर्वी सावलीत ठेवाव्यात. पॅकिंगच्या मुळाचा भाग थोडा वेळ पाण्यात बुडवून काढावा किंवा त्यावर पाणी शिंपडावे. कलम जमिनीत लावण्यापूर्वी त्यांची मुळे ३ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड प्रति लिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून लावावीत. कलमा लागवडीपूर्वी खड्डे शेणखत शेणखत अधिक माती (२:१) आणि २ किलो सिंगल सुपर फॉस्फेटने भरून ठेवलेले असावेत. कलमे खड्ड्याच्या मध्यभागी जमिनीत लावावीत. कलम लावताना मुळे स्वाभाविक अवस्थेमध्ये ठेवावीत. नंतर मुळांचा मातीबरोबर घनिष्ठ संबंध यावा यासाठी माती घट्ट दाबावी. कलमांच्या डोळ्याचा भाग जमिनीत दबणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येक कलमांचा डोळ्याचा सांधा जमिनीपासून २० सेंमी उंचीवर राहील अशा पद्धतीनेच कलमांची लागवड करावी. तसेच डोळे फांदी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने राहील याची काळजी लागवडीच्या वेळी घ्यावी. लागवडीच्या वेळी कलमे एका ओळीत येण्यासाठी झाडे लावण्याचा तक्ता वापरावा. लागवड शक्यतो रिमझिम पाऊस सुरु असताना करावी. लागवड पूर्ण झाल्यानंतर पाऊस न आल्यास लगेच पाणी द्यावे. दुसऱ्या दिवशी वापसा आल्यावर प्रत्येक कलमाच्या चहूबाजूंनी माती घट्ट दाबून घ्यावी. कलमांचे वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना बांबूच्या काठीचा आधार द्यावा. पाऊस न झाल्यास दर तीन दिवसांनी कलमांना पाणी द्यावे. कलमांना नवीन जोमदार फुटवे आल्यावरच रासायनिक खतांची मात्रा द्यावी. - डॉ. सुरेंद्र पाटील, ९८८१७३५३५३ (प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)