
पुणे ः ‘‘भाकड पशुधनाचे (Unproductive Cow) संगोपन करणे पशुपालक आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या अशक्यप्राय झाले आहे. अनेक पशुधन (Livestock) मोकाट झाले आहेत. त्यांच्या आजारपणामुळे अनेक नवनवीन विषाणूंचा फैलाव होण्याचा धोका आहे.
गोवंश हत्या बंदीमुळे मोकाट जनावरांपासून नवनवीन रोगांचा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे भविष्यातील ‘लम्पी स्कीन’सारखे नवीन विषाणूजन्य रोग निर्माण होऊ नये, यासाठी गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करण्याची नितांत गरज आहे,’’ अशी मागणी शेतकरी संघटेनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.
पाटील म्हणाले, ‘‘लम्पी स्कीनच्या फैलावासाठी शासन शेतकरी आणि पशुपालकांना जबाबदार धरत आहे. गोठा स्वच्छ ठेवला नाही म्हणून लम्पी स्कीनचा फैलाव झाल्याचा जावई शोध अधिकाऱ्यांनी लावला आहे.
मात्र या रोगाच्या फैलावासाठी गोवंश हत्या बंदी कायदा जबाबदार आहे. शेतकरी आपल्या पशुधनाची काळजी कुटुंबातील व्यक्तींप्रमाणे घेतात. गाभण गायींच्या बाळंतपणाची काळजी घरातील महिलेप्रमाणे घेतात. त्यामुळे अधिकाऱ्यांचे म्हणणे चुकीचे आहे.’’
‘‘देशी गोवंश हत्या बंदीमुळे अनेक मोकाट जनावरे झाली आहेत. त्यांना योग्य आहार, औषधोपचार करणे आता शेतकऱ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे भविष्यात अनेक विषाणूजन्य आजारांच्या फैलावाचा धोका निर्माण होईल. यामुळे तातडीने गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करावा.
भाकड जनावरांच्या विक्रीपासून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळण्याचीही गरज आहे. प्राचीन काळात भाकड पशुधनाच्या कातडी, हाडे आणि अवयवांपासून अनेक वस्तू बनविल्या जात होत्या. या वस्तूंचा वापर सैनिक युद्धात देखील करत होते. यामुळे तातडीने गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करावा,’’ असे पाटील म्हणाले.
‘कायद्यान्वये भाकड जनावरे मारण्यास परवानगी
‘‘कायद्यातील कलम ४८ अन्वये केवळ दूधदुभते गोवंश मारण्यास प्रतिबंध आहे. भाकड जनावरे मारण्यास परवानगी आहे. त्यामुळे अनुत्पादक गोवंश मारण्यास शासनाने बंदी घालू नये, अशी मागणी रघुनाथदादा यांनी या वेळी केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.