Amaravati News : मंजीले उन्हीको मिलती है जिनके सपनोंमे जान होती है, पंखोंसे भी कुछ होता होगा लेकीन हौसलोसे उडान होती है, अशाच दुर्दम्य आशावादाच्या बळावर गावखेड्यातील एका शेतकरीपुत्राने मेहनतीच्या बळावर परिस्थिती बदलवित इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. सुरुवातीला कांदा-बटाटा आणि त्यानंतर बैल खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून संपन्नतेचा पल्ला गाठणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव दिवाकर भगत आहे.
धामणगाव रेल्वेपासून अवघ्या चार किलेमीटर अंतरावरील काशीखेडचे रहिवासी असलेल्या दिवाकर भगत यांचे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झाले आहे. त्यांचे वडील पुरुषोत्तमराव हे तीन एकर शेतीचे मालक.
त्याच बळावर या कुटुंबाचा गाडा हाकला जात होता. दिवाकर यांच्यासमवेत त्यांचा भाऊदेखील शेतीत राबत गुजराण करीत होता. १९९४ मध्ये दिवाकर यांचे संगीता यांच्याशी लग्न झाले. त्यानंतर त्यांच्या संसार वेलीवर शुभम आणि पवन अशी दोन फुले फुलली.
दरम्यान २०१९ मध्ये दिवाकर यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यापूर्वीच त्यांनी मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने गाव सोडण्याचा निर्णय घेत धामणगाव रेल्वे गाठले. त्यांनी १९ वर्षांपूर्वी गाव सोडले आणि त्यांचा हा निर्णय आज योग्य ठरला आहे. सुरुवातीला त्यांनी पैशाची गरज म्हणून बटाटा-कांदा किरकोळ विक्री व्यवसाय केला. नागपूरवरून माल आणून त्याची विक्री स्थानिकस्तरावर ते करीत होते.
त्यानंतर त्यांनी आपल्या आवडत्या बैलांच्या खरेदी-विक्री व्यवसायात काम करण्याचा निर्णय घेतला. येथूनच त्यांची भरभराट सुरू झाली. या व्यवसायातून चांगला परतावा मिळू लागला आणि त्यांचे दिवस पालटले.
मुलांचे उच्च शिक्षण पूर्ण होत त्यातील शुभम हा महाराष्ट्र बॅंकेत रुजू झाला, तर पवन याने डीएमएलटी करून स्वतःची लॅब उभारली आहे. एक छोटीशी केलेली सुरुवात आज मोठ्या आर्थिक परिवर्तनाचे निमित्त कशी ठरली, याचा आदर्शच दिवाकर भगत ठरले आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.