
Dry Fodder : उन्हाळ्यात चाऱ्याच्या कमतरतेमुळे बरेच पशुपालक जनावरांना कडबा, सोयाबीन भुसकट, गव्हाचं काड, भाताचा पेंढा, उसाच वाळलेलं पाचट देतात. हा चारा जनावरांना खायला आणि पचायलाही कठीण असतो. या चाऱ्याला जनावरांना आवडेल अशी चवही नसते. अशा प्रकारच्या चाऱ्यातून जनावरांची पोषणतत्त्वांची गरज पूर्ण होत नाही.
जनावराला निकृष्ट चाऱ्यासोबत गूळ, मळी, मका, भरड यासारखे लगेच ऊर्जेचा पुरवठा करणारे पदार्थ द्यावेत. यामुळे जनावरांच्या कोटीपोटातील तंतुमय पदार्थ पचनासाठी उपयोगी असणाऱ्या जीवाणूंची संख्या आणि त्यांची क्रियाशिलता वाढल्यामुळे निकृष्ट चाऱ्याची पचनीयता वाढते.
गव्हाचं काड पाण्यात भिजवून खाऊ घातल्यास जनावरे ते आवडीने खातात. तुम्ही जर जनावरांना भाताचं काड देत असाल तर या भात काडामध्ये ऑक्झालेटचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे जनावरांच्या शरीरातील कॅल्शिअम शरीराबाहेर टाकल जातं. हे टाळण्यासाठी भाताचं काड पाण्यात भिजविल्यास त्यातील ऑक्झलेटचं प्रमाण कमी होतं आणि भात काडातील अन्नद्रव्यांच पचन चांगलं होण्यास मदत होते.
प्रक्रिया केल्यामुळे पशुखाद्याची पचनीयता १० ते २० टक्क्यांनी वाढते. त्याचा दूध उत्पादनासाठीही फायदा होतो. त्यासाठी पशुखाद्यातील कणांचा आकार लहान करणे आवश्यक असते. त्यामुळे खाद्याचं सेवन वाढतं किंवा खाद्याची पचनीयताही वाढते. त्यासाठी जनावरांना दिलं जाणारं धान्य दळून द्याव किंवा त्याचा भरडा करुण द्यावा. याशिवाय पशुखाद्यातील पाण्याचं प्रमाण कमी केल्यामुळे त्याची साठवणूक चांगली होते. आकारमानाने मोठे असलेले पशुखाद्यांच्या गोळ्या बनवाव्यात. यामुळे अन्नद्रव्यांची घनता वाढवता येते आणि पशुखाद्य वाहतुकीचा खर्चही कमी होतो.
धान्य १२ ते २४ तास पाण्यात भिजवून जनावरांना खाऊ घालावं. खुराक देखील १२ ते २४ तास पाण्यात भिजवून जनावरांना खाऊ घालावा. यामध्ये मोहरी पेंड, निंबोळी पेंड, सरकी पेंड पाण्यात भिजविल्याने त्यातील विषारी घटकांचा नाश होतो.
जनावरांच्या शरीरात नत्र आणि सल्फरची कमतरता असेल तर कोटीपोटातील पचनासाठी उपयोगी जीवाणूंच्या क्रियाशीलतेला मर्यादा येतात. त्यामुळे चाऱ्याचं पचन कमी होऊन जनावरं अशक्त होतात. हे टाळण्यासाठी चारा टंचाईकाळात किंवा ज्या ज्या वेळी वाळल्या चाऱ्याचा पशुआहारात जास्त प्रमाणात वापर होत असेल, त्या वेळी जनावरांना योग्य मात्रेत नत्र आणि सल्फरयुक्त क्षार मिश्रण द्यावीत.
जनावरांना जर हिरवा चारा दिला जात नसेल तर जनावरांमध्ये जीवनसत्त्व ‘अ' ची कमतरता दिसून येते. या कमतरतेमुळे डोळ्यातून नियमित पाणी येणं, रोगप्रतिकारशक्ती कमी होणं, सतत हगवण लागणं, डोळ्याचा पडदा पांढरा होणं, अंध वासरु जन्मणं अशा समस्या निर्माण होतात. हे सर्व टाळण्यासाठी वाळल्या चाऱ्याचा पशुआहारात जास्त प्रमाणात वापर करतेवेळी दर पंधरा दिवसांतून एकदा जीवनसत्त्व ‘अ' युक्त द्रावण तोंडावाटे द्यावं किंवा जीवनसत्त्व ‘अ' च इंजेक्शन डॉक्टरांच्या सल्ल्याने द्यावं.
अशाप्रकारे जो चारा उपलब्ध आहे अशा कोरड्या चाऱ्याची पचनीयता, पौष्टिकता, चव वाढवून त्याचा पशुआहारात वापर करावा. त्यामुळे नक्कीच कमी चाऱ्यात जनावरांच योग्यप्रकारे संगोपन करता येतं.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.