
बाळापूर, जि. अकोला : तालुक्यात पशुधन चोरीच्या (Animal Theft) घटना सतत घडत असून, पोलिसांकडून चोरट्यांवर वचक निर्माण करण्याची गरज आहे. चोरीमुळे पशुपालक (Cattle Farmer) चिंतातूर झाले आहेत.
गुरे चोरणारी टोळी सक्रिय झाल्याने तालुक्यात अनेक गावांत गुरे चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत तालुक्यात सुमारे शंभरहून अधिक गोधनांची चोरी झाली आहे.
बाळापूर तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस गोवंश चोरणारी टोळी सक्रिय झालेली आहे. बाळापूर व उरळ पोलिसांच्या हद्दीतून साधारणपणे शंभरहून अधिक गुरे चोरीला गेली आहेत.
याआधी देखील निमकर्दा, रिधोरा, व्याळा, आगर येथील नागरिकांची गुरे चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
परंतु आपली गुरे भरकटली असतील, आज ना उद्या ती परत येतील या आशेमुळे नागरिकांनी तक्रार दाखल करणे टाळले होते, मात्र आगर येथील शेतकऱ्याला बांधून ठेवून जनावरांची चोरी केल्याने खळबळ उडाली होती.
त्यानंतर या शेतकऱ्याने गुरे चोरी झाल्याची तक्रार उरळ पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर हळूहळू इतरही गावांतील शेतकरी आमची गुरे चोरीला गेली असल्याचे सांगताना दिसत होते.
गुरे चोरी होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून ही जनावरे कत्तलीसाठी चोरीला जात असल्याची चर्चा आहे. गोवंश हत्याबंदीच्या कायद्यामुळे गाय, बैल अशा पाळीव प्राण्यांच्या विक्रीवर बंदी आहे.
परंतु या जनावरांच्या मांसाला मागणी असल्याने मोकाट जनावरे चोरण्याचा सपाटाच चोरट्यांनी लावलेला आहे.
‘निर्जनस्थळी गुरे बांधू नयेत’
पोलिसांकडून गस्त सुरू आहे, शेतकऱ्यांनीही दक्षता घेणे गरजेचे आहे. शेतात किंवा गावापासून दूर अंतरावर निर्जनस्थळी जनावरे बांधू नये. गावात कोणी व्यक्ती संशयास्पद आढळून आल्यास त्वरीत पोलिसांची संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस करीत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.