Farmer Company Agrowon
यशोगाथा

Farmer Company : ‘वनश्री’ शेतकरी कंपनीची प्रक्रिया उद्योगात भरारी

Chandrakant Jadhav

Process Industries Update : नंदूरबार हा कापूस, मिरची, केळी व पपई आदी पिकांसाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. येथील पीकपद्धती, त्याआधारे बाजारपेठेतील उद्योगसंधी, त्यातून शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचाविण्यासाठी वाव होता. याच हेतूने नांदरखेडा (ता. शहादा) येथील वनश्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचा २०१६ मध्ये जन्म झाला.

कंपनीचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पुणे महाविद्यालयातून कृषी, अमेरिकेतील आयोवा विद्यापीठातून फलोत्पादनातील एमएस, तेथेच व्यवस्थापन शास्त्रातील पदवी घेतली. तेथील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत १४ वर्षे वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून अनुभव घेतला.

त्यानंतर नोकरीचा राजीनामा देत ते २०१४ मध्ये नंदुरबारात परतले. त्यांचे वडील मोतीलाल पाटील त्या काळातील कृषी पदव्युत्तर पदवीधारक आहेत. त्यांनीही नंदुरबार, धुळे जिल्ह्यांत कार्यासाठी प्रेरणा दिली. यातून कंपनीची उभारणी शक्य झाली.

मोतीलाल यांना राज्य शासनाचा वनश्री पुरस्कार मिळाला आहे. त्यावरूनच कंपनीचे नामकरण वनश्री असे करण्यात आले. संचालक म्हणून दगडू पाटील, रमेश चौधरी, शिवाजी पाटील, यशवंत पाटील, दिनेश पाटील, योगेश पटेल, संगीता पाटील ही मंडळी कामकाज पाहतात.

कंपनीविषयी दृष्टिक्षेपात

-आजघडीला कंपनीचे १३८७ सभासद. नंदूरबार व धुळे जिल्ह्यात कार्यक्षेत्र. गुजरात व मध्य प्रदेश ही राज्ये नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने निझर (जि. तापी) व बडवानी जिल्ह्यापर्यंत कंपनीचे सभासद. आपल्या भागातील १२ पिके निश्‍चित करून त्यावर कंपनीचे काम.

-मातीच्या आरोग्याला प्राधान्य देत कृषी सेवा सल्ला केंद्र व माती पाणी परीक्षण प्रयोगशाळेपासून कंपनीची सुरवात. गावोगावी जात शेतकऱ्यांसोबत संपर्क वाढविला. प्रयोगशाळेत ५० लाख रुपये गुंतवणूक. आतापर्यंत एक लाखांवर नमुन्यांची तपासणी व मार्गदर्शन.

-कापूस, केळी, पपई पिकात शेतकरी मेळावे. हवामान सल्ला व व्यवस्थापन मार्गदर्शन. रासायनिक खते व कीडनाशकांचा अनावश्यक वापर टाळण्यासंबंधी कंपनीच्या प्रयत्नांना यश.

-रास्त दरात निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कृषी केंद्र.

-नंदूरबार जिल्ह्यात उसाची १३ ते १४ हजार हेक्टरवर लागवड होते. ही बाब लक्षात घेता ऊस पिकाच्या जातिवंत रोपनिर्मितीसह ऊस उत्पादकता वाढ कार्यक्रम.

-शासनाच्या स्मार्ट योजनेतून कपाशी गाठींसाठी एक हजार टन क्षमतेचे गोदाम (नांदरखेडा).

-प्रकिया उद्योगांसाठी शीतगृह उभारणे सुरू. त्याची क्षमता दोन हजार टनांची. २४ टन क्षमतेचे केळी पिकवणी केंद्र व दररोज चार टन मिरचीवर प्रकिया होईल एवढ्या क्षमतेचे केंद्र उभे राहात आहे.

-यात आशियायी डेव्हलपमेंट बँकेच्या मदतीने व मॅग्नेट प्रकल्पातून चार कोटी रुपये तर एकूण आठ कोटी ९५ लाख रुपये प्रकल्पासाठी

मिळणार. पपई, मिरचीची शेतकऱ्यांकडून थेट खरेदी व प्रक्रिया करून अधिकाधिक मूल्यवर्धन करण्याचे नियोजन.

-ड्रोनद्वारे फवारणीची प्रात्यक्षिकेही घेतली.

कापूस जिनिंग प्रेसिंग

कंपनीने जिनिंग प्रेसिंग कारखाना दोन वर्षांपूर्वी सुरू केला आहे. कापसाची खानदेशातील शेतकऱ्यांकडून थेट तसेच खेडा खरेदी होते. प्रक्रिया क्षमता प्रतिदिन ३०० गाठी (एक गाठ १६२ किलो) आहे. यंदा १० हजार गाठींची निर्मिती झाली, त्याचा लाभ कापूस उत्पादकांना मिळाला. सन २०२२-२३ च्या हंगामात ८१०० ते कमाल ८५०० रुपये प्रति दर शेतकऱ्यांना कंपनीकडून मिळाला.

धान्य स्वच्छता, प्रतवारी

कंपनीचे धान्य स्वच्छता व प्रतवारी केंद्रही आहे. मका, सोयाबीन, गहू व हरभरा यावर येथे प्रक्रिया होते. एक रुपये प्रति किलो असे शुल्क असून, शेतकऱ्यांकडून त्यास चांगला प्रतिसाद आहे. मागील रब्बीत २० हजार क्विंटल गहू व १५ हजार क्विंटल हरभऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढे आपल्या धान्यास अधिक दर मिळवणे शक्य झाले.

रोपांची निर्मिती

कंपनीची दोन एकरांत ‘नर्सरी’ आहे. त्यात पपई, मिरची, कलिंगड, झेंडू, वांगी, टोमॅटो, कोबी आदींची दर्जेदार रोपे तयार केली जातात. रास्त दरात त्यांचा शेतकऱ्यांना पुरवठा होतो. राज्यातील महत्त्वाचा पपई व मिरचीचा पट्टा म्हणून नंदुरबार जिल्हा प्रसिद्ध आहे. हे लक्षात घेऊन दोन्ही पिकांच्या गुणवत्ताप्रधान रोपांची पुरेशी उपलब्धता करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

कंपनीची आश्‍वासक उलाढाल

सुरुवातीला कंपनीचे ४८ लाख ६० हजार रुपये भागभांडवल होते. तर उलाढाल सुरुवातीला तीन कोटी रुपये होती. सन २०२१-२२ मध्ये १९ कोटी रुपये तर २०२२-२३ मध्ये ३० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. चालू आर्थिक वर्षात ५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. शेतकऱ्यांच्या ज्ञानवर्धनासह पायाभूत सुविधांवर खर्च करण्यासंबंधी अजेंडा राबविला जातो.

संपर्क - योगेश नांद्रे - (मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘वनश्री’ कंपनी) - ९८५०७९७३००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पाऊस शक्य

Retreating Monsoon : महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीला सुरुवात

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

SCROLL FOR NEXT