Sericulture Farming Agrowon
यशोगाथा

Sericulture Management : रेशीम शेतीत व्यवस्थापन तंत्रातून मिळविले यश

माणिक रासवे

Sericulture Farming and Management Techniques :

शेतकरी नियोजन : रेशीम शेती

शेतकरी : शिवानंद नारायणराव कंठाळे

गाव : बोरी, ता. जिंतूर, जि. परभणी

एकूण क्षेत्र : २.५ एकर

तुती लागवड : १ एकर

परभणी जिल्ह्यातील बोरी (ता. जिंतूर) येथील शिवानंद नारायणराव कंठाळे यांची कुटुंबाची हलक्या ते मध्यम प्रतीची अडीच एकर जमीन आहे. जमिनधारणा क्षेत्र कमी असल्यामुळे विविध शेतीपूरक व्यवसायांचा अभ्यास त्यांनी केला. समाज माध्यमांवरील यशोगाथांमधून त्यांना रेशीम शेतीची माहिती मिळाली. शाश्‍वत उत्पन्न देणारा हा व्यवसाय करण्याचे त्यांनी निश्‍चित केले. व्यवसायास सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी अनुभवी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांकडे जाऊन प्रत्यक्ष माहिती घेण्याचे ठरविले. त्यानुसार माहिती घेऊन सप्टेंबर २०१८ मध्ये रेशीमशेतीचा श्रीगणेशा केला.

शिवानंद कंठाळे हे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत वस्सा (ता. जिंतूर) येथे विविध कार्यकारी पतसंस्थेमध्ये सचिव (सेक्रेटरी) म्हणून कार्यरत आहेत. कर्तव्याची जबाबदारी सांभाळत दररोज सकाळी, संध्याकाळी तसेच सुट्टीच्या दिवशी पूर्णवेळ रेशीम शेतीतील कामे ते करतात. रेशीमशेतीतील कामांमध्ये वडील नारायणराव आणि बंधू मोहन यांची मोठी मदत मिळते, असे शिवानंद यांनी सांगितले.

प्रत्यक्ष घेतली माहिती :

परभणी जिल्ह्यातील देवठाणा (ता. पूर्णा) तसेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. त्यांच्याकडून रेशीम शेतीचे व्यवस्थापन, आव्हाने आणि संधी याबाबत माहिती मिळाली. २०१८ मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेतर्फे आयोजित रेशीम शेतीचे प्रशिक्षण पूर्ण केले.

रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे यांच्याकडून प्रात्यक्षिकांसह सखोल माहिती मिळाली. बोरगव्हाण (ता. पाथरी) येथील रेशीम उत्पादक शेतकरी राधेश्याम खुडे यांनी शेतावर येऊन माहिती दिली.

रेशीम शेतीचा प्रारंभ....

२०१७ मध्ये एक एकर क्षेत्रावर तुतीच्या व्ही-१ जातीची साधारण ५ बाय ३ बाय २ फूट अंतरावर लागवड केली. सप्टेंबर २०१८ मध्ये जालना जिल्ह्यातील चॉकी सेंटरवरून १५० बाल्य कीटक (चॉकी) खरेदी करून रेशीम शेतीस प्रारंभ केला. परंतु व्यवस्थापनातील काही त्रुटींमुळे पहिल्या बॅचपासून कोष उत्पादन मिळाले नाही.

त्यानंतर २०१८ मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेतर्फे आयोजित रेशीम शेतीचे प्रशिक्षण पूर्ण केले. आणि पुढील वर्षभरात रेशीम कोष उत्पादनासाठी आवश्यक तांत्रिक कौशल्य अवगत केले. त्यानंतर पुढील बॅचमध्ये कोष उत्पादनात सुधारणा झाली.

बॅच नियोजन :

तुतीच्या पानांच्या उपलब्धतेनुसार वर्षभरात साधारण ४ बॅचचे नियोजन केले जाते. दोन बॅचमध्ये साधारण दोन ते अडीच महिन्यांचे अंतर राखले जाते. रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी बायव्होल्टाइन जातीच्या १०० ते १५० अंडीपुंजाच्या प्रत्येक बॅचपासून सुमारे ९० ते १२५ किलोपर्यंत कोष उत्पादन मिळू लागले. असे सर्व बॅचमधून वर्षाला सरासरी ३५० ते ४०० किलो कोष उत्पादन शिवानंद यांना मिळत आहे. प्रत्येक बॅचसाठी सरासरी १२ ते १३ हजार रुपये खर्च येतो.

माफक खर्चातील संगोपनगृहाची उभारणी :

रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी शेतातील उंच जागी २४ बाय ५० फूट आकाराचे तसेच १५ फूट उंचीचे संगोपनगृह त्यांनी उभारले आहे. छतासाठी सिमेंट पत्र्यांचा वापर केला आहे. संगोपनगृहाभोवती जमिनीवर चारही बाजूने सिमेंट पत्रे लावून त्यावर शेडनेट कापड लावले आहे.

लोखंडी पट्ट्या, नायलॉन जाळी तसेच साड्यांचा वापर करून रॅक तयार केले आहेत. अशारीतीने तुलनेने माफक खर्चात संगोपनगृहांची उभारणी शक्य झाली आहे. रेशीम कीटकांच्या वाढीसाठी आवश्यक तापमान राखण्यासाठी संगोपनगृहामध्ये उन्हाळ्यात कूलर लावले जातात. तसेच फॉगरचा वापर केला जातो. हिवाळ्यात थंड वाऱ्यांपासून संरक्षणासाठी तागाच्या पिशव्यांचा वापर केला जातो.

व्यवस्थापनातील बाबी :

- प्रत्येक बॅचमधील कोष काढणी आणि विक्री पूर्ण झाल्यानंतर संगोपनगृहाची स्वच्छता, निर्जंतुकीकरण या बाबींवर विशेष लक्ष दिले जाते.

- बाल्य अवस्थेत रेशीम कीटकांची विशेष काळजी घेतली जाते.

- प्रत्येक बॅचमधील रेशीम कीटकांना पुरेशा प्रमाणात तुती पाला उपलब्ध होण्यासाठी तुती बागेचे कोटकोर व्यवस्थापन केले जाते. त्यासाठी कोष काढणी सुरु झाल्यानंतर तुती बागेची छाटणी केली जाते.

- छाटणी पूर्ण झाल्यानंतर सऱ्यामध्ये नांगरणी, वखरणीची कामे केली जातात. त्यानंतर रासायनिक खतांच्या मात्रा देऊन सिंचने केले जाते.

- छाटणीनंतर साधारण दीड महिन्यात रेशीम कीटकांना फीडिंग करण्यायोग्य तुतीची पाने तयार होतात.

- दरम्यानच्या काळात बाल्य कीटकांची मागणी चॉकी सेंटरकडे कळविली जाते. बॅचच्या नियोजनानुसार नियोजित दिवशी बाल्य कीटक संगोपनगृहावर आणले जातात. त्यानंतर रेशीम कोष उत्पादनासाठी पुढील बॅच सुरू होते. दोन बॅचमध्ये साधारण ६० दिवसांचे अंतर राखले जाते. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी होऊन दर्जेदार कोष उत्पादन मिळते, असे शिवानंद कंठाळे सांगतात.

मागील कामकाज :

- जुलै महिन्यातील १५० अंडीपुंजाच्या बॅचपासून साधारण ९० किलो कोष उत्पादन मिळाले आहे. उत्पादित कोषाची परळी वैजनाथ येथील एका व्यापाऱ्याला प्रति किलो ४२५ रुपये दराने विक्री केली.

- तुती बागेची छाटणी करून आंतरमशागतीची कामे केली. त्यानंतर १०ः२६ः२६ आणि युरिया खताची मात्रा बागेला देऊन सिंचन केले. परंतु दरम्यानच्या काळात तुती बागेची वाढ अपेक्षित न झाल्यामुळे सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत नियोजित बॅच घेणे शक्य झाले नाही.

- डिसेंबर महिन्याच्या शेवटी तुती बागेची वाढ चांगली झाल्यामुळे रेशीम कीटकांसाठी पुरेशी पाने उपलब्ध झाली. त्यानुसार डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बॅच घेण्याचे ठरविले.

- नवीन बॅच घेण्यापूर्वी डिसेंबरच्या मध्यात संगोपनगृहाची स्वच्छता, निर्जंतुकीकरण करून घेतले. तसेच चॉकी सेंटरकडे १५० चॉकीची मागणी नोंदविली.

आगामी नियोजन :

- सध्या बॅच सुरू होऊन ८ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असून, तिसरा मोल्ट बसला आहे.

- बाल्यावस्थेतील कीटकांना पुरेशा प्रमाणात तुती पाला दिवसातून दोन वेळा दिला जातो. कीटक लहान असल्याने प्रतिदिन साधारण पाच किलो पाला पुरेसा होतो.

- सध्या हिवाळ्याचे दिवस असून तापमानात घट होत आहे. त्यानुसार संगोपनृहातील तापमान योग्य राखण्याचा प्रयत्न केला जाईल. शेडच्या बाजूने लावलेल्या पत्र्यांवर शेडनेट कापड लावून घेतले जाईल.

- या बॅचपासून ११० ते १२५ किलो उत्पादन मिळण्यासाठी काटेकोर व्यवस्थापनावर भर दिला आहे.

- ही बॅच साधारण २० ते २२ जानेवारीला पूर्ण होईल. त्यानंतर विश्रांती देऊन संगोपनगृहाची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण यावर भर दिला जाईल.

- शिवानंद कंठाळे, ७७६७९७४२८८

(शब्दांकन : माणिक रासवे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT