Rabi Jowar
Rabi Jowar Agrowon
यशोगाथा

Rabi Jowar : भात, रब्बी ज्वारी पिकांत मिळवली मास्टरी

विकास जाधव 

सातारा जिल्ह्यात अनेक शेतकरी नियोजनपूर्वक शेती करत विक्रमी उत्पादन घेत राज्यस्तरीय पुरस्कारावर मोहर उमटवत आहेत. सोनगाव (ता. जावळी) येथील साहेबराव मन्याबा चिकणे यांच्या कुटुंबीयांची १२ एकर शेती (Agriculture) आहे. आपल्या संदीप व सचिन या दोन मुलांच्या मदतीने ते शेती करतात. सुरुवातीच्या काळात सिंचनाची (Irrigation) सोय नसल्यामुळे जिरायती शेती (Rainfed Agriculture) करत असत. मात्र २००५ मध्ये विहीर काढून एक हजार फूट पाइपलाइन केली. त्यानंतर शेतजमिनीचे सपाटीकरण करून योग्य आकाराचे भाग केले.

त्यात भात, ऊस, रब्बी ज्वारी, गहू आदी पिके घेण्यास सुरुवात केली. पाण्याची शाश्‍वती झाली. मग पीक पद्धतीमध्ये बदल केला. आता पिकांच्या उत्पादनवाढीवर दोन्ही बंधूंनी लक्ष दिले. त्यासाठी आवश्यक तिथे बोरगाव केव्हीके येथील संग्राम पाटील, डॉ. महेश बाबर, कृषी सहायक भानुदास चोरगे यांची मदत घेतली. शेती तंत्रामध्ये बदल, कीड रोगांचे वेळीच नियंत्रण आणि पीक पोषणासाठी खतांचा योग्य वापर यावर भर देण्यात आला. त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादनवाढीमध्ये दिसू लागला. आणि दोन्ही बंधूंचा हुरूप वाढत गेला.

भात पिकाचे नियोजन

चिकणे कुटुंबीयांचे भात पिकाचे लागवड नियोजन हे मे महिन्यापासूनच सुरू होते.

शेतात गतवर्षीचा शिल्लक भाताचा सर्व पेंढा विस्कटून रोटर मारला जातो. त्यामुळे पीक अवशेषातील सिलिकॉन व अन्य अन्नद्रव्ये पुढील पिकास मिळतात.

व्यवस्थित मशागत करून सुरुवातीस ताग या हिरवळीची खतपिकाची लागवड केली जाते. त्याची योग्य वाढ होताच ती जमिनीत गाडून सेंद्रिय कर्बाची बेगमी केली जाते.

जून महिन्याच्या सुरवातीला चार गुंठे क्षेत्रामध्ये रोपवाटिका केली जाते.

भात पेंढ्याची अर्धवट जाळलेली पांढरी राख रोपवाटिकेमध्ये टाकली.

बेडवर दहा सें.मी.वर रेषा मारून बीजप्रक्रिया केलेले १६ ते २० किलो बियाणे लावले जाते. त्याच्या वाढीसाठी योग्य काळजी घेतली जाते. दरम्यानच्या काळात बैलाचा नांगर व टॅक्टरच्या साह्याने मशागत करतात.

शेणखत ४ ट्रॉली व मेंढ्या बसवून लेंडी खताचा वापर केला जातो.

सर्वसाधारणपणे २१ दिवसांनंतर भातरोपांच्या पुनर्लागवडीचे नियोजन असते. पुनर्लागवडीपूर्वी रोपांच्या मुळांवर ॲझोटोबॅक्टर व पीएसबीचे द्रावण करून प्रक्रिया केली जाते.

साधारणपणे लागवडीच्या वेळीच फेरस सल्फेट ८ किलो, झिंक सल्फेट ८ किलो, सिलिकॉन १० किलो, मॅग्नेशिअम सल्फेट चार किलो, ०-०५० हे खत २५ किलो, दाणेदार ह्युमिक ॲसिड आठ किलो असा बेसल डोस देतात. जुलै महिन्याच्या सुरुवातीस बैलाच्या साह्याने चिखलणी केली जाते.

त्यामध्ये चारसूत्री पद्धतीने भात लागवड केली जाते. १५ बाय २५ सेंमी अंतरावर लागवड केली. चार रोपामध्ये एक युरिया ब्रिकेट या खोचली जाते.

फुटवा वाढीसाठी ह्युमिक ॲसिड दाणेदार दिले जाते. आणि पुनर्लागवडीनंतर तीस दिवसांनी १९-१९-१९ व कॅल्शिअमची एक फवारणी घेतात. त्यानंतर दाणे भरणीच्या वेळी ०-०-५० विद्राव्य खताच्या फवारण्या केल्या जातात.

एक महिन्याचे पीक झाल्यानंतर एकरी १०० किलो अमोनिअम सल्फेट दिले.

भाताचे उच्चांकी उत्पादन

संदीप यांना २०१९-२० मध्ये गुंठ्याला १२० किलो, २०२०-२१ मध्ये १३१ किलो, २०२१-२२ मध्ये १५४.७८५ किलो भाताचे उत्पादन मिळाले आहे. अशा प्रकारे गेल्या वर्षी सर्वाधिक भात उत्पादन घेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या वर्षी १३५ किलो प्रति गुंठा असे उत्पादन मिळाले आहे. संदीप यांना एक एकर भात क्षेत्रासाठी मशागत ते काढणीपर्यंत ५० हजारापर्यंत खर्च येतो. सरासरी ५० ते ७० पोती भात उत्पादन मिळते. (एक पोते साधारण ८० ते ९० किलो भरते.) १०० किलो भातापासून सुमारे ७० किलो तांदूळ मिळतो. ६० रुपये किलोप्रमाणे तयार तांदूळ विकला जातो.

रब्बी ज्वारी

संदीप यांनी भाता पीक बरोबर रब्बी ज्वारीतही मास्टरकी मिळवली आहे. पूर्वी केवळ पीक लावून मिळेल तितके उत्पादन घेतले जात असे. मात्र आता रब्बी ज्वारीमध्ये योग्य नियोजन केले जाते. २०-२१ मध्ये त्यांनी रब्बी ज्वारीचे हेक्टरी १०१ क्विंटल उत्पादन घेत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. भाताप्रमाणे रब्बी ज्वारीचे ते नियोजन करत असतात. प्रत्येक वर्षी दोन एकर रब्बी ज्वारी केली जाते. पीक व्यवस्थापनाचा एकरी ३५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. सध्या ज्वारीला साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याचे संदीप सांगतात.

रब्बी ज्वारीचे व्यवस्थापन

रब्बी ज्वारीच्या ‘फुले रेवती’ या वाणाच्या एकरी चार किलो पायाभूत बियाण्याचा पेरणीसाठी वापर.

ॲझोटोबॅक्टर व पीएसबीची बीज प्रक्रिया करून, बैलाच्या साहाय्याने तीन फणी पाभरीच्या साह्याने पेरणी करतात.

प्रत्येक ताटातील अंतर २० सेंमी राहील, याची काळजी घेतली जाते. आवश्यक तिथे विरळणी करून किंवा नांगे भरून ताटांची संख्या योग्य ठेवली जाते. यामुळे कणसांचा व दाण्याचा आकार मोठा मिळण्यास मदत होते.

शेणखत एकरी चार ट्रॉली, लेंडी खताचा वापर.

शिफारसीनुसार रासायनिक खताचा वापर ः एकरी निंबोळी पेंड १०० किलो, १०-२६-२६ तीन पोती (१५० किलो), सिलिकॉन पाच किलो, फेरस सल्फेट आठ किलो, झिंक सल्फेट आठ किलो, मॅग्नेशिअम सल्फेट पाच किलो, ह्युमिक ॲसिड दाणेदार १० किलो असा बेसल डोस लागवडीवेळी दिला जातो. ज्वारी ३० दिवसाची झाल्यानंतर पुन्हा एकदा युरिया एक पोते दिले जाते. हलके पाणी दिले जाते. -कीड-रोग नियंत्रणासाठी वेळीच फवारणी घेतली जाते. ज्वारी, भात पिकासाठी दोन वेळेस जिवामृत देण्यात आले.

अन्य शेती व पूरक बाबी

या दोन पिकासह चार ते पाच एकर क्षेत्रावर उसाची लागवड असते. त्याचही एकरी ७० ते ८० टनांपर्यंत उत्पादन घेत आहेत.

खरिपामध्ये सोयाबीन ३ ते ४ एकर, रब्बीमध्ये गहू २ एकर आणि हरभरा एक ते दीड एकर अशी अन्य पिके असतात.

चार म्हशी, दोन बैल, टॅक्टर व औजारे आहेत. जनावरे व गेल्या वर्षापासून गांडूळ खताचे युनिट सुरू केले आहे.

मागणीनुसार भात व ज्वारीची पॅकिंग करून मुंबई, गोवा, पुणे येथे विक्री केली जाते. वडिलांसह सर्व कुटुंबातील सर्वच सदस्य शेतीमध्ये राबत असतात.

विक्रमी उत्पादनासाठी केव्हीके, बोरगाव मधील तज्ज्ञ संग्राम पाटील, डॉ. महेश बाबर आणि कृषी विभागातील तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, मंडल कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव, संजय घोरपडे, कृषी सहायक भानुदास चोरगे यांची मोलाची मदत झाली असल्याचे संदीप सांगतात.

भात शेतीतील महत्त्वाच्या बाबी

इंद्रायणी वाणाच्या पायाभूत बियाण्याचा वापर केला जातो.

भात लागवडीत चारसूत्री पद्धतीचा

काटेकोर अवलंब.

लागवड झाल्यावर वाफ्यातील

पाणी दररोज बदलले जाते.

एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचा अवलंब. पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर.

शिफारशीनुसार खताचा व तणनाशकाचा वापर केला जातो.

संदीप चिकणे, ७३८७२४१३६२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT