Crop insurance
Crop insurance Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : आंबा, काजूच्या पीकविमा भरपाईत कंपनीकडून फसवणूक

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः आंबा, काजू पीकविमा (Mango Cashew Crop Insurance) भरपाईवरून जिल्ह्यातील बागायतदार आक्रमक झाले आहेत. कंपनीने भरपाई (Insurance Compensation) देताना फसवणूक केल्याचा आरोप बागायतदारांनी केला आहे. या संदर्भात वेंगुर्ला येथे झालेल्या बैठकीत बागायतदारांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचे निश्‍चित केले. तसेच न्याय न मिळाल्यास त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा आणि काजू लागवडीखालील क्षेत्र आहे. २०२१-२२ मध्ये हजारो शेतकऱ्यांनी आंबा, काजूचा पीकविमा उतरविला होता. या वर्षी ३० नोव्हेंबरपर्यंत विमा उतरविण्याची मुदत होती. १ डिसेंबरपासून विमा संरक्षणाचा कालावधी सुरू झाला. हा कालावधी १५ मेपर्यंत होता. डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार पाऊस झाला. आंबा, काजूला आलेल्या मोहोराचे सुरुवातीला नुकसान झाले. त्यानंतर सातत्याने ढगाळ वातावरण, काही भागात गारपीट, अवकाळी पाऊस पडत राहिला. तापमानदेखील अनेकदा ३७ अंश सेल्सिअस पेक्षा वाढले. त्यामुळे आंबा, काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बागायतदारांना नुकसानीप्रमाणे विमा भरपाई मिळेल, अशी अपेक्षा होती.

दरम्यान, चार- पाच दिवसांपासून बागायतदारांच्या खात्यात विमा भरपाईची रक्कम जमा होत आहे. मात्र बागायतदारांची निराशा झाली. काही बागायतदारांना हेक्टरी १० हजार, तर काहींना आठ हजार रुपये मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. अनेक शेतकऱ्यांनी कोणत्या निकषानुसार भरपाई दिली, याची विचारणा करण्यासाठी बँकेकडे धाव घेतली. परंतु बँक अधिकारी देखील ठोस उत्तर देऊ शकले नाहीत. या संदर्भात गुरुवारी (ता.१८) आंबा, काजू बागायतदारांची वेंगुर्ला येथील फळ संशोधन केंद्रात बैठक झाली. या वेळी आंबा, काजू शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, रिलायन्स इन्शुरन्सचे जिल्हा प्रतिनिधी सिद्धेश येडवे, तालुका कृषी अधिकारी हर्षा गुंड, नयन सावंत, आशिष आईर, भूषण नाबर आदी उपस्थित होते.

येडवे यांनी दिलेल्या भरपाईबाबत स्पष्टीकरण दिले. पावसामुळे झालेल्या नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. मात्र उष्णतेमुळे झालेल्या नुकसानीबाबत स्कायमेंट कंपनी आणि शासनातर्फे प्रकिया सुरू आहे. अहवाल कंपनीकडे आल्यानंतर उर्वरित विमा रक्कम जमा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. मंडलनिहाय डाटा संकलन केला आहे. त्यानुसार भरपाई मिळायला हवी, अशी मागणी बागायतदारांनी केली. भरपाई संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचे या वेळी निश्चित करण्यात आले. न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी शेतकऱ्यांनी दिला.

पीकविमा भरपाई देताना विविध निकषांचा आधार घेतला जातो. पाऊस आणि उष्णता यावरून नुकसान भरपाई दिली जाते. आता शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम ही पावसाची आहे. उष्णतेच्या निकषाप्रमाणे मिळणारी भरपाई अजून मिळालेली नाही.

- दत्तात्रेय दिवेकर, जिल्हा कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT