October Heat Agrowon
संपादकीय

October Heat : सावधान! संक्रमण काळ आहे

Team Agrowon

Rabbi Crop Harvesting : देशात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास सुरू आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत परतीच्या पावसाच्या सरी बरसत आहेत, तर विदर्भ, मराठवाड्यात हवामान काहीसे स्वच्छ निरभ्र झाले आहे. त्यामुळे तापमानाचा पारा वाढतोय. त्यातच या वर्षी ऑक्टोबरमध्ये कमाल आणि किमान तापमानाचा पारा सरासरीच्या अधिक राहण्याचा अंदाज आहे.

अर्थात, दुपारी ‘ऑक्टोबर हीट’ अधिक जाणवणार आहे तर पहाटेचा गारवाही कमीच राहण्याची शक्यता वर्तवली जातेय. पावसाळ्याच्या चार महिन्यांत राज्याच्या बऱ्याच भागांत पाऊस कमी झाल्याने परतीच्या पावसाने थोडाफार दिलासा मिळतोय. परंतु सोयाबीनसह इतरही खरीप हंगामातील काढणीला आलेल्या पिकांसाठी परतीचा पाऊस नुकसानकारक ठरतो.

रब्बी हंगामाच्या अनुषंगाने देखील परतीचा पाऊस चांगलाच म्हणता येईल. हा पाऊस जमिनीत ओल वाढवितो, धरण, तलाव, भूगर्भातील पाणीपातळीही वाढवितो. त्याचा फायदा रब्बीसाठी होऊ शकतो. परंतु दोन दिवसांत मॉन्सून राज्यातून परतून ऑक्टोबर हीट अधिक जाणवू लागेल.

सर्वाधिक सुखद आणि सर्वत्र नवचैतन्य भरणाऱ्या पावसाळ्यानंतर ऑक्टोबर हीट म्हणजे दिवसभर रखरखते ऊन, घामाने चिंब झालेले शरीर अन् कोंदट वातावरणात जिवाची घालमेलच अधिक होते.

महाराष्ट्रात ऑक्टोबर महिना हा ऋतू संक्रमण काळ असतो. शेतीच्या दृष्टीनेही हा खरीप-रब्बी हंगाम संक्रमणाचाच काळ असतो. या संक्रमण काळात खरीप हंगामातील पिकांची काढणी करणे, खरिपातील शेतीमाल विकणे, रब्बी हंगामातील पिकांसाठी जमिनीची मशागत करणे, रब्बीसाठीच्या बी-बियाण्याची सोय करणे, रब्बी पिकांची पेरणी अशा अनेक कामांत शेतकरी व्यस्त असतो.

नवरात्र-दसरा-दिवाळी अशा महत्त्वाच्या सण-उत्सवाचाही हात काळ असतो. ग्रामीण भागात शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीने सण-उत्सव साजरे करतात. या सर्व पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वाधिक धावपळीचा हा काळ म्हटले तर वावगे ठरणार नाही.

ऑक्टोबर हीटचे प्रतिकूल परिणाम माती-पाण्यापासून ते मानवी शरीर असे सर्वांवरच जाणवू लागतात. निरभ्र आकाश, स्वच्छ कोरडे वातावरण, याच काळात सूर्य कर्कवृत्ताकडून विषुववृत्ताकडे सरकत असतो.

यामुळे सूर्याची किरणे विना अटकाव थेट जमिनीवर येतात. त्यामुळे देखील तापमान वाढते. या सर्वांच्या परिणामस्वरूप जमिनीतील ओल लवकर फाकते, अथवा कमी होते. भूपृष्ठावरील जलसाठ्यांतून (तलाव, धरणे, बंधारे) पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होते. भूगर्भातील पाणीपातळीही खालावू लागते. उष्णतामान वाढत असल्याने खरीप पिकेही लवकर काढणीला येऊ लागतात.

उसाच्या पानातील पाण्याचे उत्सर्जनाचा वेग वाढून शाकीय वाढीचा वेग मंदावतो आणि ऊस पक्वतेस प्रारंभ होतो. अशावेळी खरीप पिकांची काढणी शेतकऱ्यांनी शक्य तेवढ्या लवकर उरकून घ्यावी. अन्यथा, मागील काही वर्षांपासून याच काळात मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकांचे नुकसान वाढविले आहे.

तसेच पक्व उसाची योग्य वेळी तोडणी झाली म्हणजे वजन आणि उतारा चांगला मिळतो. ऊसतोडणी गळीत हंगामाच्या सुरुवातीवर अवलंबून असल्याने राज्य सरकार तसेच कारखान्यांनी याबाबत लवकर निर्णय घ्यायला हवा.

खरीप पिकांची काढणी झाल्यानंतर रब्बी पिकांची पेरणी कमीत कमी मशागतीमध्ये शेतकऱ्यांनी उरकून घ्यावी. म्हणजे जमिनीतील ओलीचा पुरेपूर फायदा रब्बी पिकांना घेता
येईल. या वर्षी मुळातच पाऊस कमी असल्याने पाणीटंचाई जाणवत आहे.

अशावेळी रब्बी हंगामासाठी भूगर्भ आणि भूपृष्ठावरील पाण्याचा योग्य वापर झाला पाहिजे. ऋतुसंधीकाळात मानवी शरीरात देखील अनेक बदल घडून येतात. याच काळात रोग संक्रमणही अधिक होते. पित्त प्रकोप जाणवतो. पचनाचे विकारही जाणवू लागतात. अशावेळी योग्य आहार-विहारातून आपले आरोग्यही चांगले राहील, याची काळजी घ्यायला हवी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहे हरभरा दर?

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचे वाढण्याचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

GIS System : ‘जीआयएस’ देऊ शकते नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

SCROLL FOR NEXT