Rain Agrowon
संपादकीय

Monsoon Update : मॉन्सून, माती अन् मशागत यांचा संबंध जाणून घ्या

Team Agrowon

Weather Update : या वर्षीचा मॉन्सून थोड्या उशिराने महाराष्ट्र राज्यात अखेर दाखल झाला आहे. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक वातावरण असल्याने तळ कोकणासह, कोल्हापूरच्या काही भागांत पोहोचलेला मॉन्सून लवकरच राज्य आणि पुढे देश व्यापेल.

मॉन्सूनचा पाऊस, माती आणि हंगामनिहाय पिके यांचा फार घनिष्ठ संबंध आहे. परंतु अजूनही आपण केवळ पाण्यालाच महत्त्व देतो. यंदा पाऊस किती पडणार? याचीच चर्चा अधिक असते. मागील तीन वर्षांचे पाऊसमान पाहिले तर राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला.

धो-धो कोसळणाऱ्या पावसाने अनेक ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या. यात पिकांचे नुकसान झाले, मातीही वाहून गेली.

तर तत्पूर्वीचे सहा-सात वर्षे राज्यात अत्यंत कमी पाऊस पडून काही भागांचे वाळवंटीकरण होतेय की काय? अशी भीती वाटत होती. राज्यात काळ्या मातीचे प्रमाण अधिक आहे. बहुतांश जमिनी उंच-सखल आहेत. मॉन्सूनच्या पावसाने अशा जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते.

राज्यात ८० टक्क्यांहून अधिक जमीन जिरायती (कोरडवाहू) आहे. कोरडवाहू जमिनीतील मातीत किती पाणी टिकून राहू शकते, हेही पाहावे लागेल. पावसाळ्यात पाण्याचे मोठे खंड पडतात. अशा खंड काळात काळ्या चिकण मातीला सुकल्यावर भेगा पडतात.

पिकांची मुळे तुटतात. त्यामुळे मातीत ओल असूनही पिकांना ते वापरता येत नाही आणि पिके देखील सुकू लागतात.

पावसाळ्यात पाऊस किती पडतो, यावरून कोणती पिके, कशी येणार, याचा सरासरी अंदाज बांधता येतो. परंतु पीक चांगले येण्यासाठी पाऊस कधी, कुठे, किती जोरात पडतो आणि पडलेल्या पावसाचे नेमके काय होते? हे शेतकऱ्यांना सांगितले पाहिजे. पाऊस पडल्यानंतर बहुतांश पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाते.

काही मातीत मुरते तर काही पाण्याचे मातीत मुरण्यापूर्वी बाष्पीभवन होते. पृष्ठभागावरून वाहून जाणाऱ्या पाण्याने मातीची धूप होते. मातीत मुरलेल्या काही पाण्याचे देखील जमिनीतून बाष्पीभवन होते आणि ते निघून जाते. काही पाणी जमिनीत खोलवर जाते व या पाण्याचा देखील पिकांना उपयोग होत नाही. अर्थात पडलेल्या पाण्यापैकी फारच थोडे पाणी प्रत्यक्षात वनस्पती अथवा पिकांना मिळते.

पिकांसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून द्यायचे असेल तर मातीची धूप थांबवून पावसाचे अधिकाधिक पाणी जमिनीत मुरवावे लागेल, मुरलेले पाणी अधिक प्रमाणात पिके कशी घेतील, हेही पाहावे लागेल. मातीची धूप थांबवायची म्हणजे एकतर बंधारे बांधा, नाहीतर वृक्ष लागवड करा, असे सर्रासपणे सांगितले जाते.

परंतु सर्व ठिकाणी एक प्रकारचेच बंधारे उपयुक्त ठरत नाहीत, हे सिद्ध झाले आहे. आणि आत्तापर्यंत अनेकदा कोट्यवधी लावलेले वृक्ष गेले कुठे? हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. त्यामुळे मातीची धूप थांबवायची असेल तर शेताच्या उताराला अनुसरून बांधबंदिस्ती करायला पाहिजेत. जमिनीवर चर निर्माण करूनही माती आणि पाणी दोन्हीचे संधारण होऊ शकते.

पेरणीपूर्वी सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढवून मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढू शकते. जमिनीची हलकी मशागत आणि पिकांची पेरणी करताना रुंद वरंबा-सरी पद्धतीचा अवलंबही करावा लागणार आहे. आच्छादनाने देखील मातीत ओलावा टिकून राहतो. पावसाच्या खंड काळात हा उपायही प्रभावी ठरतो.

मातीचा प्रकार आणि पडणारा पाऊस यानुसार खरीप हंगामात पीक पेरणीचे नियोजन शेतकऱ्यांनी करायला हवे. ज्या पिकांना नियमित पाण्याची गरज असते, अशी पिके हलक्या जमिनीत घेऊ नयेत. एकाच शेतात सातत्याने पिके घेत राहिल्याने देखील जमिनी खराब होत आहेत. अशावेळी एखादा हंगाम जमीन पडीक ठेवून अथवा भूसुधारणा करूनच त्यात पिके घेतली पाहिजेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहे हरभरा दर?

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचे वाढण्याचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

GIS System : ‘जीआयएस’ देऊ शकते नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

SCROLL FOR NEXT