Mango product
Mango product Agrowon
संपादकीय

Mango Export : हापूसबरोबर इतर जातींची वाढवा निर्यात

डॉ. नागेश टेकाळे

मागील जून महिन्यात झारखंड या आदिवासीबहूल राज्याला ‘नाबार्ड’च्या (NABARD) माध्यमाने भेट देण्याची संधी मिळाली. झारखंड येथील गरीब, अल्पभूधारक आदिवासी शेतकऱ्यांनी केशर, आम्रपाली, चौसा, दशहरा या विविध आंबा (Mango Production) उत्पादनात केलेली प्रगती पाहून डोळे दिपून गेले. केवळ मॉन्सूनमध्येच शेती आणि नंतर पुढचे दोन ऋतू केवळ जंगलावर उपजीविका करणारा हा पूर्ण उपेक्षित शेतकरी आज नाबार्डच्या साह्याने आंबा उत्पादनात यशाचे मनोरे रचत आहे.

विशेष म्हणजे त्यांचे आंबा उत्पादन स्थानिक पातळीवरच विक्री होते, दिल्ली, कोलकाता स्थित व्यापारी आंब्याच्या बागेत येऊन आंबा खरेदी करतात. त्यातून मिळणाऱ्या चार पैशात तेथील गरीब शेतकरी मला जास्त सुखी आणि आनंदी वाटला. त्यांचा हा उत्कृष्ट दर्जाचा आंबा निर्यात झाला तर हा समाज अजून जास्त आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकणार नाही काय?

जगामधील ५० टक्के आंबा उत्पादन भारतात होते. मात्र आंबा निर्यातीमध्ये थायलंड, मेक्सिको, नेदरलँड, पेरू आणि ब्राझील भारतापेक्षा खूपच पुढे आहेत. आपला समज आहे की हापूस हेच फळ निर्यात होऊ शकते आणि त्यात थोडेफार तथ्य आहेच. देवगड, रत्नागिरीमध्ये जांभा दगडावर रुजलेला हापूस स्वादाला उत्कृष्ट असतो.

म्हणूनच तो सर्व निर्यात होतो, पण त्याच हापूसच्या तोडीस तोड भारताच्या इतर राज्यांत सुद्धा उत्कृष्ट प्रकारचे आंबे आहेत. देशांतर्गत गरज भागवून त्यांची सुद्धा निर्यात वारी होणे गरजेचे आहे. त्यासाठी आंबा निर्यात होणाऱ्या विविध देशांत आपण आपल्या देशामधील निर्यातक्षम वाणांचे आकर्षक प्रदर्शन भरविणे गरजेचे आहे. जागतिक पातळीवरील अशा कृषी प्रदर्शनातून विविध राज्यांमधील उत्कृष्ट दर्जाच्या आंब्यांची ओळख तेथील खरेदीदारांना होणे आवश्यक आहे.

आज एकट्या अमेरिकेत लाखो भारतीय स्थायिक आहेत. या सर्वांनाच आंबा आवडतो; पण त्यांच्या घरात हापूस व्यतिरिक्त इतर भारतीय आंबा आढळतच नाही. त्यांच्या घरामधील लहान मुलांना अल्फान्सो (हापूस) व्यतिरिक्त इतर एकही आंब्याचे नवे वाण माहीत नाहीत. आंब्यासाठी आपले पहिले ग्राहक तेथे राहणारे आपलेच लोक आहेत.x

आज एकट्या अमेरिकेत लाखो भारतीय स्थायिक आहेत. या सर्वांनाच आंबा आवडतो; पण त्यांच्या घरात हापूस व्यतिरिक्त इतर भारतीय आंबा आढळतच नाही. त्यांच्या घरामधील लहान मुलांना अल्फान्सो (हापूस) व्यतिरिक्त इतर एकही आंब्याचे नवे वाण माहीत नाहीत. आंब्यासाठी आपले पहिले ग्राहक तेथे राहणारे आपलेच लोक आहेत. या वर्षी भारताने कोरोनाच्या मागील दोन वर्षांच्या कालखंडाच्या तुलनेत आंब्याची सर्वांत जास्त निर्यात केली आहे.

आपल्या आंबा खरेदीमध्ये दक्षिण कोरिया, जपान आणि अर्जेंटिना आघाडीवर होते. विशेष म्हणजे जपानला जास्त आंबा निर्यात झाला आणि याचाच फायदा आपण घ्यावयास हवा. जपानी लोकांना त्यांच्या आहारामधील वैविध्य जास्त आवडते. एकच एक चव सहसा त्यांना आवडत नाही. म्हणून झारखंड, उत्तर प्रदेशमधील आंब्याच्या विविध दर्जेदार जाती या नवीन बाजारपेठेत जाणे गरजेचे आहेत.

भारताची २०२१-२२ मधील आंबा निर्यात ४४ दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचली. जी २०१९-२० च्या ५६.११ दशलक्ष डॉलरच्या तुलनेत कमी आहे. कारण अमेरिकेने फळे तपासणीच्या नावाखाली आपली आयात थांबवली होती. आपण ती परीक्षा पास झाल्यामुळे १००० टन हापूस, केसर आणि इतर जाती अमेरिकेस रवाना झाल्या, पण आता आपण जपान आणि अर्जेंटिनाची बाजारपेठ काबीज करणे जास्त महत्त्वाचे आहे.

यासाठी प्रत्येक राज्यामधील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मजबूत जाळे निर्माण होणे आवश्यक आहे. निर्यात आंबा म्हणजे हापूस आणि नंतर केसर असे समजून चालणार नाही. आपले इतर ब्रॅण्डसुद्धा पुढे येणे गरजेचे आहे. यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालयांनी एकत्र येऊन पुढील हंगामासाठी आत्तापासूनच काम करणे महत्त्वाचे आहे. राज्य सरकारच्या मदतीने आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा शोध घेणे ही आवश्यक आहे.

दुबई, डेन्मार्क, तुर्की आणि जर्मनीमधील आंबा उत्पादन प्रक्रिया आणि तयार उत्पादन निर्यात करणाच्या संघटनेबरोबर आपले संबंध जास्त फायद्याचे ठरू शकतात. आंबा फळ ताज्या अवस्थेत भारत आणि पाकिस्तानमधून पश्‍चिम आशियामधील अनेक राष्ट्रांना निर्यात होते तर दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्रांची बाजारपेठ फिलिपिन्स आणि थायलंडने काबीज केली आहे.

दक्षिण पूर्व आशियात आपला आंबा पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी वातानुकूलित कंटेनर जे समुद्री मार्गे जातात त्यांची निर्मिती आपल्या देशात प्राधान्याने होणे ही काळाची गरज आहे. असे झाल्यास आपली निर्यात वेगाने वाढू शकते.

आज आपल्या देशात एक हजार पेक्षाही जास्त प्रकारच्या आंब्याच्या जाती आहेत. त्यातील फक्त ३० जातींनाच व्यापारी महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातील ५० टक्क्यांपेक्षाही जास्त हिस्सा एकट्या हापूसचा आहे. यात बदल होणे गरजेचे आहे. झारखंडमध्ये नाबार्डच्या आर्थिक मदतीने उभ्या राहिलेल्या विविध आंब्याच्या शेकडो बागा मी पाहिल्या.

ज्या आंबा वाणांची नावे सुद्धा मी कधी ऐकली नव्हती आणि चवीला ते आंबे हापूसपेक्षा कितीतरी पटीने उत्कृष्ट होते. आपण चाखत असलेली हीच चव विदेशी लोकांच्या ओठावर उतरली तर आपल्या आंबा निर्यातीस प्रचंड मोठे बळ मिळू शकले आणि ठरावीक व्यापारी आंबा जातींवरील आपले अवलंबित्व कमीही होऊ शकते. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना फळ निर्यातीच्या मुख्य प्रवाहात आणणे सुद्धा शक्य होऊ शकते.

आज आपला निर्यातक्षम हापूस आंबा वातावरण बदलाच्या ताणतणावामधून जात आहे. अवेळी पडणारा पाऊस, थंडीचे कमी होणारे प्रमाण, विविध प्रकारच्या किडीमुळे सुद्धा आज हे फळ संकटात सापडत आहे. त्याचे उत्पादनही कमी होत आहे. त्याचा फटका आंबा निर्यातीलाही बसत आहे. हापूसचा सन्मान राखत आपले दशहरी, आम्रपाली, सफेदा, राटावूल (Rataul) यांनी देशाबाहेर पाऊल ठेवणे आवश्यक आहे. असे झाल्यास देशातील खासकरून झारखंडमधील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनास बळकटी मिळेल. त्यांचे अर्थशास्त्र सुधारेल.

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT