धुळे ः जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसागणिक तीव्र होत आहे. परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, टॅंकर वाढविण्याची मागणी केली जात आहे.
जिल्ह्यात यंदा पाऊस हवा तसा नव्हता. सरासरीच्या सुमारे ८२ टक्के पाऊस झाला आहे. परंतु विहिरी व कूपनलिका यांची पाणीपातळी वाढविण्याच्या दृष्टीने नदी व नाले खळखळून वाहिलेच नाहीत. पाऊस ऑक्टोबर महिन्यात झाला. सरासरीपर्यंत पाऊस झाला, परंतु हव्या त्या भागात पाऊस नव्हता. त्यात साक्री तालुक्याचा उत्तर भाग, धुळे तालुक्यातील पूर्व व पश्चिम भाग, शिरपूर तालुक्यातील मध्य आणि दक्षिण भाग, शिंदखेडा तालुक्यातील पूर्व आणि दक्षिण भागात पाऊस नव्हता.
सद्यःस्थितीमध्ये सुमारे ६२ गावांमध्ये पाणीटंचाई आहे. या गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असून, तात्पुरत्या पाणी योजनाही राबविल्या जात आहेत. परंतु तात्पुरत्या पाणी योजनांना मात्र अडचणी येत असून, या योजनांच्या स्रोतांनाही मुबलक पाणी नसल्याने समस्या वाढल्या आहेत.
बेटावद, न्याहळोद, कापडणे, दोंडाईचा आदी मोठ्या गावांमध्ये पाण्याबाबत काटकसर करावी लागत आहे. पांझरा नदीला नंतर पाणी आले होते. त्यामुळे काहीसे जलसाठे वाढले. परंतु फेब्रावारीअखेरच जलसाठे कमी झाले आहेत. आजघडीला शेतांमधील विहिरी व कूपनलिकांचे पाणी घटले असून, सिंचन करताना अडचणी येऊ लागल्या आहेत.
शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील पाण्याची समस्या असलेल्या भागातील केळी बागांनाही फटका बसत आहे. शेतकऱ्यांना पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना नाकीनऊ येऊ लागले आहेत.