पुणे ः भाेर, वेल्हा तालुक्यांतील दुर्गम भागात असलेल्या वाड्या-वस्त्यांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. उंचावर असलेल्या या वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा योजना राबवणे अवघड असते. अशा गावांमध्ये शिवकालीन टाक्यांप्रमाणे खडकातील साठवण टाक्या उभारण्यात येणार अाहेत. यासाठी जिल्हास्तरीय जलयुक्त शिवार अभियान समितीने एक कोटी ७५ लाख ११ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली.
जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतारे यांनी ही माहिती दिली. शिवतारे म्हणाले, की भोर आणि वेल्हा तालुक्यांतील दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. या वस्त्यांची पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर झाली पाहिजे, यासाठी गेली ३-४ वर्षे सतत पाठपुरवा केला. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये, जिल्हाधिकाऱ्यांकडे निधीची मागणाी केली.
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन तेथे सर्व्हे करण्यात आला. त्यामुळे या वाड्या-वस्त्यांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानामध्ये करण्यात आला. नुकतीच भोर तालुक्यातील पाच गावांमधील १४ वाड्या, वस्त्यांवर खडकातील टाक्या बांधण्यासाठी व विहीर दुरुस्तीसाठी आणि वेल्ह्यातील २ गावांच्या दोन वाड्या-वस्त्यांवरील साठवण टाक्यांसाठी १ कोटी ७५ लाख ११ हजारांचा निधी मिळवण्यात यश आले.
प्रत्येक टंचाई बैठकीच्या वेळी या वाड्या-वस्त्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शिवकालीन खडकातील टाक्या हा एकच पर्याय असल्याची निदर्शनास आणून दिले. परंतु त्यासाठी निधी मिळत नव्हता. या टाक्यांसाठी जागा मिळणे, ती शासनाच्या नावावर करण्यासाठी स्थानिकांशी चर्चा केली. या भागातील पंचायत समिती सदस्य तसेच, गटविकास अधिकारी संतोष हराळे यांनी विशेष सहकार्य केले.
भोर तालुक्यातील हिर्डोशीच्या मालुसरेवस्ती, धामनदेव, सोमजाई वस्ती, शिरवली हिमा गावठाण, चौधरीवस्ती, करंजगाव गावठाण, डेहेन गावठाण, सोनारवाडी, जळकेवाडी, हुंबेवस्ती, धनगरवस्ती, पारवाडी गावठाण येथे खडकातील टाक्या बांधण्यात येणार आहेत. वेल्हे तालुक्यातील आसनी मंजाईच्या धनगर वस्ती आणि खानू गावठाणामध्ये साठवण टाक्या बांधण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.