पाणीपट्टी वसुलीसाठी आता अल्टिमेटम
नाशिक : थकीत पाणीपट्टीमुळे संबंधित ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा रद्द करण्याचे जाहीर करूनही पाणीपट्टी भरण्याला अपेक्षित प्रतिसाद नसल्याने आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी पुन्हा एकदा ग्रामपंचायतींना अल्टिमेटम दिला आहे.
थकीत पाणीपट्टीमुळे नांदगाव शहर व ५६ खेडी पाणीपुरवठा योजना, दाभाडी १२ गाव पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा थकीत पाणीपट्टीमुळे खंडित करण्यात आला होता. याबाबत झालेल्या आढावा बैठकीत सर्व ग्रामपंचायतींनी टप्प्याटप्प्याने थकीत पाणीपट्टी भरण्याचे मान्य केल्याने २४ आॅगस्टपासून हा पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश डॉ. गिते यांनी दिले. या वेळी उपकार्यकारी अभियंता ए. एन. पाटील, उपअभियंता प्रकाश बोरसे उपस्थित होते.
या तिन्ही योजनांतून आतापर्यंत दीड कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. गावातील पाणीपट्टी वसूल करून जिल्हा परिषदेला भरण्याचे ग्रामसेवकांना बंधनकारक असूनदेखील त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच पाणीपेट्टी थकीत राहण्याचे प्रमाण वाढले असल्याने यापुढे याबाबत ग्रामसेवकांना जबाबदार धरणार असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले. नांदगाव व मालेगाव तालुके दुष्काळग्रस्त असल्याने टप्प्याटप्प्याने पाणीपट्टी भरण्यासाठी मुदत देण्याची सरपंचांची मागणी आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २५ टक्के थकबाकी भरून उर्वरित रक्कम विहित मुदतीत भरण्याचे आदेश डॉ. गिते यांनी दिले.
वसुलीसाठी ग्रामसेवकांना जबाबदार धरण्यात येणार असल्याने आता वसुलीसाठी जिल्हा परिषद सतर्क झाली आहे. यापूर्वी ग्रामसेवकांना आणि ग्रामपंचायातींना देखील पाणीबिल भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. स्थायीच्या सभेतही वादळी चर्चा झालेली होती. परंतु, ग्रामपंचायतींकडून अपेक्षित जबाबदारी घेतली जात नव्हती. त्यामुळे शासनाने वसुलीसाठी विशेष नियोजन केले आहे.