नगर : जिल्ह्यात नाफेडमार्फत तूर खरेदी सुरू आहे. तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागत आहे. बुधवारपर्यंतच (ता. १८) ऑनलाइन नोंदणी सुरू राहणार असून त्यासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील दहा खरेदी केंद्रावर एक लाख क्विंटल तूर खरेदी झाली आहे.
जिल्ह्यामध्ये गतवर्षी तूर खरेदीचा प्रश्न गंभीर झाला होता. केवळ कृषी विभागाने तूर उत्पादनाचा योग्य अहवाल दिला नसल्याने ऐनवेळी तूर खरेदीचा प्रश्न निर्माण झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे यंदा कृषी विभागाने सावध पवित्रा घेतला. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार जिल्ह्यात ५४५० रुपये क्विंटल दराने नाफेडने सुरू केलेल्या केंद्रांवर तुरीची खरेदी सुरू आहे.
सुरवातीला नगर, जामखेड, नेवासा, पारनेर, वांबोरी (राहुरी), कर्जत, शेवगाव, श्रीरामपूर, मिरजगाव या नऊ ठिकाणी तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. परंतु कर्जत येथील तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आले. त्यानंतर श्रीगोंदा येथे केंद्र सुरू केल्याने जिल्ह्यामध्ये सध्या दहा खरेदी केंद्रावर तूर खरेदी सुरू आहे. तुरीचे हेक्टरी ११ क्विंटल २२ किलो उत्पादन झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला. अहवालानुसार एका शेतकऱ्यांकडून एकरी चार क्विटंल ११ किलोप्रमाणे तूर खरेदी केली जात आहे.
सरकारी खरेदी केंद्रावर तूर विक्री करण्यासाठी अगोदर ऑनलाइन नोंदणी करावी लागत आहे. आतापर्यंत तब्बल १६ हजार ८४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली तर १०,२२५ शेतकऱ्यांनी तुरीची विक्री केली. आता १८ एप्रिलपर्यंतच ऑनलाइन नोंदणी सुरू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी नोंदणी करायला तीन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यानंतर मात्र तूर खरेदीसाठी नोंदणी होणार नसून ज्यांनी नोंदणी केली त्यांचीच तूर खरेदी केली जाणार आहे.
आतापर्यंत खरेदी केंद्रांवर ५५ कोटी रुपयांची एक लाख ५५४ क्विटंल तूर खरेदी करण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दिलेल्या वेळेत नोंदणी करावी, असे अावाहन जिल्हा पणन अधिकारी भारत पाटील यांनी केले आहे.