सातारा ः जिल्ह्यात उसाच्या वाढलेल्या क्षेत्रामुळे गतवर्षीच्या तुलनेत आजपर्यंत सुमारे १५ लाख ५० हजार ६७५ मेट्रिक टन उसाचे अधिक गाळप झाले आहे. जिल्ह्यात सोमवारअखेर (ता. ५) ६९ लाख ८१ हजार ८३२ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून ८१ लाख ७७ हजार २१५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे तसेच अनेक कारखान्यांनी वाढविलेली गाळप क्षमता यामुळे गतवर्षीच्या तुलनेत अधिक गाळप झाले आहे.
जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी ६९ लाख ८१ हजार ८३२ मेट्रिक टन ऊस गाळपाद्वारे ८१ लाख ७७ हजार २१५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. गतवर्षी १५ मार्च अखेर ५४ लाख ३१ लाख १५७ मेट्रिक टन ऊस गाळपाद्वारे ६५ लाख १६ हजार १८६ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी १५ लाख ५० हजार ६७५ मेट्रिक टन उसाचे अधिक गाळप झाले तर १६ लाख ६१ हजार २९ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक असल्याने या हंगामाचे दिवस लांबणार असून, अनेक कारखान्यांचा गाळप एप्रिल अखेरपर्यंत चालणार असल्याचे सांगितले जात आहे. या गाळप हंगामात सह्याद्री कारखान्याने गाळप व साखरनिर्मितीत तर जयवंत शुगरने साखर उताऱ्यात आघाडी कायम ठेवली आहे.
एफआरपी रकमेत झालेल्या वाढीमुळे उसाचे दरात शाश्वती आली आहे. यामुळे जिल्ह्यात उसाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहेत. पुढील गाळपासाठी जिल्ह्यात अजूनही उसाची लागवड केली जात असल्याने उसाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. या दृष्टीने साखर कारखान्यांना गाळप हंगामाचे नियोजन करावे लागणार आहे.
गतवर्षीच्या तुलनेत गाळपाचे आकडे वाढले असले तरी जिल्ह्यातील सरासरी उताऱ्यात मात्र घट झाली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. जिल्ह्यात गतवर्षी सरासरी १२ टक्के साखर उतारा मिळाला होता, या वर्षी मात्र ११.७१ टक्के सरासरी उतारा मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत ०.२९ टक्के साखर उतारा कमी मिळत आहे. सहकारी कारखान्यांच्या सरासरी साखर उताऱ्यात ०.१९, तर खासगी कारखान्यांच्या साखर उताऱ्यात ०.३१ टक्क्यांनी घट झाली आहे.