औरंगाबाद : मराठवाडा व खानदेशातील सहा जिल्ह्यांमधील २२ साखर कारखान्यांनी यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभाग नोंदविला. या सर्व कारखान्यांनी आतापर्यंत ७२ लाख ५१ हजार ८१५ टन उसाचे गाळप केले आहे. या सर्व साखर कारखान्यांचा साखर उतारा सरासरी ९.७४ टक्के राहिला असून, ७० लाख ६३ हजार ७२१ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
औरंगाबादच्या प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या अखत्यारित मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड व खानदेशातील धुळे, नंदूरबार व जळगाव असे सहा जिल्हे येतात. या सहा जिल्ह्यांतील ३७ साखर कारखान्यांपैकी २२ साखर कारखान्यांनी यंदा ऊस गाळप हंगामात सहभाग नोंदविला.
धुळे जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळपात सहभाग नोंदविला नाही. नंदूरबार जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी ९ लाख १२ हजार ६२६ टन उसाचे गाळप करत ९.८२ टक्के साखर उताऱ्याने ८ लाख ९६ हजार १९१ क्विंटल साखर उत्पादन केले. जळगाव जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी ३ लाख ५१ हजार ८२७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. सरासरी ९.०१ टक्के उताऱ्याने ३ लाख १७ हजार २० क्विंटल साखर उत्पादन या कारखान्यांनी केले.
औरंगाबाद जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी गाळपात सहभाग नोंदविला. या पाच कारखान्यांनी १२ लाख ९८ हजार ४५५ टन ऊस गाळप करीत १२ लाख ६४ हजार ३३५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. जालना जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी १६ लाख ८९ हजार ६७२ मेट्रिक टन उसाचे गाळप करत १६ लाख ७२
हजार ५५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले.
बीड जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांनी २९ लाख ९९ हजार २३५ टन उसाचे गाळप केले. सरासरी ९.७१ टक्के साखर उताऱ्यातून २९ लाख १३ हजार ६२५ क्विंटल साखरेचे उत्पादन या कारखान्यांनी घेतल्याचे साखर विभागाचे आकडे सांगतात.
खानदेशातील दोन व मराठवाड्यातील एक मिळून तीन साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. या कारखान्यांमध्ये नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी सहकारी साखर कारखाना, जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताबाई शुगर अँड एनर्जी तसेच जालना जिल्ह्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.
या कारखान्यांपैकी नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक १०.१९ टक्के राहिला. जळगाव व जालना जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचा उतारा अनुक्रमे ९.३३ व ९.१३ टक्के राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली.