मुंबई ः कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या ७७ लाख खातेदारांपैकी सुमारे ४१ लाख शेतकऱ्यांच्या कर्जाबद्दलची माहिती बँकांकडून आली आहे. येत्या काळात सर्व बँकांची परिपूर्ण माहिती येईल; अशा जिल्ह्यात कर्जमाफीचा तातडीने लाभ देण्याची सुरवात केली जाईल, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी (ता. ४) दिली.
ते मंत्रालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, अकोला, उस्मानाबाद, जालना, यवतमाळ, जळगाव, चंद्रपूर आणि सोलापूर या सात जिल्ह्यांतील सर्व बँकांकडून शेतकऱ्यांच्या कर्जाबद्दलची बहुतांश माहिती सहकार खात्याकडे आली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती सहकार खात्यातील उच्चपदस्थ सूत्रांकडून देण्यात आली.
यावेळी सहकारमंत्री देशमुख पुढे म्हणाले, की शेतकरी कर्जमाफीसाठी २२ सप्टेंबरअखेर ५६ लाख ५९ हजार ऑनलाइन अर्ज आले आहेत. या अर्जांमध्ये ७७ लाख २९ हजार खातेदारांचा समावेश आहे.
३ ऑक्टोबरअखेर विविध ३२ व्यापारी बँकांनी २० लाख ५४ हजार खातेदारांची कर्जाबाबतची माहिती तसेच ३० जिल्हा बँकांनी ३६ लाख ३६ हजार खातेदारांपैकी सुमारे २० लाख ३५ हजार खातेदारांच्या कर्जाची माहिती विहित नमुन्यात भरली आहे. त्यापैकी १५ लाख खातेदारांची माहिती सहकार विभागाच्या लेखापरीक्षकांनी प्रमाणित केली आहे. आधार क्रमांक बँकांना दिलेल्या पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी या योजनेचा लाभ देण्यास शासन प्रयत्नशील अाहे.
ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू नसलेल्या गावांत कर्जमाफीच्या माहितीचे चावडी वाचन करण्यात आले आहे. इतर गावांत ग्रामपंचायत निवडणुकीनंतर चावडी वाचन करण्यात येणार आहे, असे मंत्री देशमुख यांनी सांगितले.
‘पवार यांचे म्हणणे खरे होऊ दे’
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्जमाफी १० ते १२ हजार कोटींच्या पुढे जाणार नाही, असे म्हटले आहे. यासंदर्भात विचारणा केल्यावर सहकारमंत्री देशमुख म्हणाले, की पवारांचे म्हणणे खरे होऊ दे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, राष्ट्रवादी काँग्रेसला दहा हजार कोटी रुपये देऊन कर्जमाफी करायला सांगावे, त्यामुळे राज्याची बचत होईल आणि शेतकऱ्यांची कर्जमाफीसुद्धा होईल, असा टोलाही त्यांनी हाणला.